परीक्षा शिक्षकांची होती की बॅंकेची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षा शिक्षकांची होती की बॅंकेची?
परीक्षा शिक्षकांची होती की बॅंकेची?

परीक्षा शिक्षकांची होती की बॅंकेची?

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षकांची अभियोग्यता तपासण्यात आली की, बॅंकेच्या अधिकाऱ्याची?, असा संतप्त प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षेत (टेट) विज्ञान, भूगोल, इतिहास, राज्य घटनेसंदर्भात एकही प्रश्न नसल्याने उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेवर आक्षेप घेतला आहे. तसेच तांत्रिक अडचणीमुळे वेळ अपुरा पडल्याची प्रतिक्रिया अनेक उमेदवारांनी ‘सकाळ’कडे नोंदविली आहे. त्यातीलच काही निवडक प्रतिक्रिया....

मी स्वतः दिव्यांग असून, आमच्यासाठी अधिकचा वेळ देण्यात आला नाही. संगणकाच्या स्क्रीनवर आणि प्रवेशपत्रात अधिकच्या २० मिनिटांचा उल्लेख आहे. पण, प्रत्यक्ष मात्र ही वेळ दिली नाही.
- पूजा कायस्थ, दिव्यांग विद्यार्थिनी

आरआरबी पीओ पदासाठीचे प्रश्न कॉपी पेस्ट केले असून, त्यांचे गुगल मराठी भाषांतर टाकण्यात आले होते. आम्ही २०१७ च्या परीक्षेप्रमाणे अभ्यास केला. मात्र, शिक्षकांच्या पदाचा विचार न करता प्रश्न काढण्यात आले.
- अश्र्विन पांडे, मूर्तिजापूर, अकोला

इंग्रजी आणि मराठीत प्रश्न संगणकाच्या स्क्रिनवर एकत्र ठेवल्याने वाचन करता आले नाही. उत्तराचे पर्याय पाहताना अधिक वेळ गेला. दिलेल्या वेळेत २०० प्रश्नांची उत्तरे क्लिक करणे अशक्य आहे.
- अभिमान हंगे

शिक्षण क्षेत्रातील २०० पैकी फक्त १५ प्रश्न विचारले होते. गणित वगळता भाषा, समाजशास्र, विज्ञान आदी विषयांचे प्रश्नच नव्हते. खरंतर ही सट्टा पद्धतीने नशीबवान शिक्षकांची भरती आहे.
- सलीम मणेरी, बारामती

टेट परिक्षेचा अतिशय वाईट अनुभव आला. सर्व विषयांचे ज्ञान पडताळण्याऐवजी केवळ बुद्धिमत्तेचे ज्ञान पडताळण्यात आले. परीक्षेसाठी व्यवस्थापन सुधारणे गरजेचे आहे.
- प्रदिप त्रिभुवने, पासर्डी, ता. भडगाव जि. जळगाव
अतिशय कमी वेळेत प्रश्नांची वाक्यरचना समजून घेणे अवघड होते. त्याचबरोबर भाषा विषयाचे प्रश्न अतिशय कमी होते.
- दयानंद शेळके, लातूर

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजलेच नाही. वेळेअभावी ७० ते ८० प्रश्न सोडविता आले नाही. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न कसे आले, याची दखल परीक्षा परिषदेने घ्यायला हवी.
- मुस्तफा रहेमान शेख, करडखेल, ता. उदगीर, लातूर


परीक्षार्थींना आलेल्या अडचणी ः
- २०० प्रश्न सोडविण्यासाठी केवळ १२० मिनीटे.
- बुद्धिमत्तेचे प्रश्न संख्या निम्म्याहून अधिक, विद्यार्थ्यांना ते प्रश्न वाचणे, समजून घेणे आणि सोडविणे ३६ सेकंदात अशक्य.
- पूर्ण प्रश्न स्क्रीनवर दिसत नव्हता. प्रश्न व त्याचे सर्व पर्याय पाहण्यासाठी स्क्रीन खाली-वरती करावी लागत होती. यामुळे वेळ वाया जात होता.
- सामाजिक शास्त्र, सामान्य ज्ञान, विज्ञान, चालू घडामोडींवर एकही प्रश्न नाही.
- ‘आयबीपीएस’ कंपनी ज्याप्रमाणे बँकेच्या परीक्षा घेते, त्याच पद्धतीचा पॅटर्न ‘टेट’साठी वापरला