
चार वर्षानंतर विमानसेवेचे ‘उड्डाण’ पुणे-मुंबई सेवा : २६ मार्चपासून सुरुवात
पुणे, ता. १७ : पुणे-मुंबई विमानसेवेचे तब्बल चार वर्षांनंतर उड्डाण होत आहे. एअर इंडिया ही विमानसेवा सुरू करीत असून, पुणे विमानतळाच्या समर शेड्यूलमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. येत्या २६ मार्चपासून पुण्याहून मुंबईसाठी ही सेवा सुरू होत आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला एका तासांत पोचणे शक्य होणार आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
पुणे-मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी पुणे विमानतळ प्रशासन मागील काही दिवसांपासून प्रयत्न करीत आहे. विंटर शेड्यूलमध्ये पुणे व मुंबई विमानतळावर स्लॉट राखीव ठेवला होता. मात्र त्यावेळी एअर इंडियाकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नसल्याने तो स्लॉट रद्द केला.
या आहेत वेळा
मुंबईहून दररोज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारे विमान पुण्याला १० वाजून ५० मिनिटांनी पोचेल. पुण्यात ३० मिनिटे थांबल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने ११ वाजून २० मिनिटांनी उड्डाण करेल आणि मुंबईला १२ वाजून २० मिनिटांनी पोचेल. याचा फ्लाइंग टाइम १ तास असून, यासाठी एटीआर-७२ या विमानाचा वापर केला जाणार आहे.
पहिली सेवा ‘एयर इंडिया’ची
पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये पुणे-मुंबई-दिल्ली अशी दररोज विमानसेवा सुरू होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर २०१७ मध्ये जेट एअरवेजने पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, ती सेवा काही कारणांमुळे २०१९ मध्ये बंद झाली. त्यानंतर विमानसेवा सुरू करण्याबाबत केवळ चर्चा झाल्या. प्रत्यक्षात मात्र ही विमानसेवा चार वर्षानंतर सुरू होत आहे.
विमानसेवेचा फायदा काय?
- एका तासात मुंबई गाठणे शक्य; परिणामी प्रवासाच्या वेळेत मोठी बचत
- मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाने पुढचा प्रवास करणे सोपे
- कार्गो सेवेलादेखील चालना मिळण्याची शक्यता