इंद्रायणी नदी

इंद्रायणी नदी

इंद्रायणी स्वच्छतेसाठी सहकार्याची ग्वाही
जिल्हाधिकाऱ्यांची कालबद्ध उपायांची सूचना
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ : सर्वांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून संबंधित यंत्रणांनी कालबद्ध उपाययोजना करावी. कामाच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्‍यक तेथे तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. इंद्रायणी स्वच्छतेच्या उपाययोजनांना गती देऊन त्या कालबद्ध चौकटीत पूर्ण केल्या जाव्यात. प्रदूषित पाणी तसेच सांडपाणी मिसळू नये म्हणून सर्व यंत्रणांनी संवेदनशीलपणे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
सर्व नगरपरिषदांनी आपले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा आखून कामाला गती देणे आवश्‍यक आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या एसटीपीच्या अनुषंगाने रेल्वे क्रॉसिंगबाबत परवानगीसाठी वेगाने पाठपुरावा करण्यात येईल. तळेगाव येथील कार्यान्वित न होऊ शकलेल्या एसटीपीचा क्षमतावाढीचा आराखडा तयार केला जावा. देहू नगरपंचायतीनेही अल्पमुदतीच्या उपाययोजना तत्काळ पूर्ण कराव्यात. आळंदी येथील एसटीपी विहित कालमर्यादेत पूर्ण करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी मनपामार्फत उभारण्यात येत असलेल्या एसटीपी आणि ईटीपीची (इफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट) माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ मार्च २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्याने सुमारे ३१ एमएलडी दैनंदिन सांडपाणी प्रक्रिया क्षमतेचे एसटीपी कार्यान्वित करण्यात येणार असल्याने नदीप्रदुषणमुक्तीसाठी मोठा हातभार लागणार आहे. चिखली येथील अस्तित्वातील प्रकल्पाच्या क्षमतावाढीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. तसेच चिखली येथेच नव्याने हाती घेतलेल्या १२ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प, भोसरी, भोसरी तलाव, कुदळवाडी येथील प्रकल्पांचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे.’’
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अधिकारी, लोणावळा, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, आळंदी नगरपरिषद आणि देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नारायण शिंदे, वारकरी डी. डी. भोसले पाटील आदी उपस्थित होते.
---
कान्हे पंचायतीचा आदर्श
मावळ तालुक्‍यातील कान्हे ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व सांडपाण्यावर
अभिनव पद्धतीने प्रक्रिया करून त्याचा गावातच पुनर्वापर केल्यामुळे नदीमध्ये अजिबात सांडपाणी सोडले जात नाही. कान्हे गावाने केलेल्या उपाययोजना जिल्हा परिषदेने इतरही गावांत राबवून सांडपाण्याचा पुनर्वापर करावा. तसेच नदीकाठच्या सर्व मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये शोषखड्ड्यांचा उपक्रम राबवावा १०० टक्के, असेही यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com