अवतीभवती

अवतीभवती

महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे बालरंग महोत्सव
पुणे, ता. ३ ः महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे बालदोस्तांसाठी ‘बालरंग महोत्सव २०२३’ या नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. यंदाचे या महोत्सवाचे २४वे वर्ष आहे. ७ ते १७ मे या कालावधीत महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात रोज सायंकाळी ७ वाजता महोत्सवातील नाटके सादर होतील. महोत्सवाची सुरुवात ‘मिंग्लिश मीडियम’ या नाटकाने होणार आहे. हा या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग असणार आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित ‘ग्रिप्स’ची ‘पक्का लिंबू टिंबू’, ‘मिस् कॉम्पिटिशन’ आणि ‘चेरी एके चेरी’ तीन नव्याकोऱ्या नाटकांच्या शुभारंभाचे प्रयोग यात होणार आहेत. यासह ‘आलंय आमच्या लक्षात’, ‘जीर्णोद्धार’, ‘सात फेटेवाला’ आणि ‘डान्स ऑल द वे’ ही नाटकेही पाहता येतील.

‘ईकासाच्या नावानं चांगभलं’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे, ता. ३ ः देशातील सर्वच राजकीय व्यवस्था बरबटलेली असल्याने राजकीय पक्ष हे खोक्याची संस्कृती बनलेले आहेत. यामुळे विकासाच्या नावाने चांगभलं, असा वैतागलेला सूर जनतेमधून निघताना दिसत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. साहित्यविश्व प्रकाशनातर्फे आयोजित कवी वि. वा. यशवंतराव लिखित ‘ईकासाच्या नावानं चांगभलं’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे, अ‍ॅड. असीम सरोदे, साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम शिंदे आदी उपस्थित होते. ‘समाजात घडणाऱ्या वाईट घटनांवरील भाष्य कवितेच्या पुस्तकात काव्य रूपाने मांडले आहे’, असे वि. वा. यशवंतराव यांनी सांगितले.

कर्तव्यपालन ही देखील देशसेवाच ः डॉ. शेटे
पुणे, ता. ३ ः ‘कर्तव्य आणि अधिकार’ यामध्ये अधिकारांबद्दल तावातावाने बोलले जाते, त्याविषयी जागरूकताही असते, पण कर्तव्यपालनाबाबत मात्र उदासीनताच अधिक दिसते. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, शहर स्वच्छतेला हातभार लावणे आदी दैनंदिन कर्तव्यपालन करणे ही देखील देशसेवाच आहे, असे मत ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या ‘संत्रिका’ विभाग समन्वयक डॉ. मनीषा शेटे यांनी व्यक्त केले. भूमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘मातृभूमी पूजन’ तसेच निवृत्त कर्नल पंकज करवंदे यांच्यासह डॉ. शेटे यांच्याशी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन ‘धारेश्वर लॅबोरेटरी’तर्फे करण्यात आले होते, त्या वेळी त्या बोलत होत्या. ‘वंदे मातरम्’ गीताच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या मिलिंद सबनीस यांचा सत्कार यावेळी करवंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अनिता आवटे यांनी आभार मानले. ॲड. निलीमा म्हैसूर, कार्पोरेट ट्रेनर श्रीकर पुरंदरे, अनुराधा कुकनूर, समीर पल्लौड आदी उपस्थित होते. जान्हवी ओक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com