वाढत्या गोंगाटाच्या समस्येचे करायचे काय ?

वाढत्या गोंगाटाच्या समस्येचे करायचे काय ?

गेल्या आठवड्यात पुण्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. ‘स्वच्छ कल्याणीनगर’ आणि विमाननगर, वडगाव शेरी, कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे ४० गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी ‘व्हाइस अगेन्स्ट द नॉईज’ (गोंगाटाविरुद्ध आवाज) या मोहिमेंतंर्गत गोंगाटाबद्दल आवाज उठविला तर, चार दिवसांपूर्वी संगीतकार ए. आर. रेहमान यांचा कार्यक्रम होता. तो संपायला २२ मिनिटे उशीर झाला म्हणून पोलिसांनी स्टेजवर जाऊन तो थांबविला. पोलिसांच्या तत्परतेबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुकही केले पण, काही प्रश्न अद्यापही जसेच्या तसेच आहेत.
- मंगेश कोळपकर
@MkolapkarSakal

शहरात गोंगाटाची पातळी वाढत चालली आहे, ही तक्रार नाही तर, हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहराच्या पूर्व भागातील नागरिकांनी पोलिस, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, लोकप्रतिनिधींकडे वारंवार दाद मागितली. थातूरमातूर उपाययोजनांच्या पलिकडे हा प्रश्न गेला नाही अन सुटलेलाही नाही ! मध्य भागातील रस्त्यांवर तर, उभं राहून फोनवर बोलणंही शक्य होत नाही. पुण्याचा भौगोलिक विस्तार वाढत आहे. लोकसंख्या सुमारे ६२ लाख झाली आहे तर, वाहनांची संख्या ३३ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यातच शहरात मेट्रोसारखे अनेक प्रकल्प, रस्त्यांची कामे, बांधकामे सुरू आहेत. वाहनांच्या दर्जात सुधारणा होत असल्यामुळे हॉर्नदेखील वैविध्यपूर्ण आले असून ते उपद्रवी ठरू लागले आहेत. भरीस भर म्हणजे शहराच्या अनेक भागांत पब, हॉटेल्स, बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. अधून-मधून जयंती, उत्सव, यात्रा असतात. त्यांचे महत्त्व असले तरी, त्यावेळी मोठ्या आवाजात स्पीकर्स लावून ते साजरी करण्याची अनिष्ट प्रथा रूढ होत आहे.
पुण्यात घरोघरी ज्येष्ठ नागरिक आहेत. अनेक घरांत रुग्ण असतात. विद्यार्थीही मोठ्या संख्येने आहेत. शहरात स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तीन लाखांहून अधिक विद्यार्थी राहतात. त्या सगळ्यांनाच वाढलेल्या आवाजाचा त्रास होतो. गोंगाटाचा व्यक्तीच्या मानसिकतेवर, हृदयावर आणि मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यातून व्यक्तीमध्ये चिडचिड वाढते. दवाखाने, रुग्णालये आणि शाळांच्या परिसरात महापालिकेने शांतता क्षेत्र (सायलेंट झोन) निश्चित केले आहे. त्या ठिकाणी वाहनांचा हॉर्न वाजविण्यावर निर्बंध आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी होते का? वाढलेल्या आवाजाचा त्रास नागरिकांना होत आहे, हे प्रशासकीय यंत्रणांपर्यंत पोचते का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर, वडगाव शेरीमधील नागरिकांनी गोंगाटाच्या प्रश्नावर आवाज उठविल्यावर बावधनमधील नागरिकही त्यात सहभागी झाले. यावरून शहरातील या समस्येची तीव्रता लक्षात येते. परदेशात वाहनांचे हॉर्न अत्यावश्यक असेल तरच वाजविले जातात. आपल्या देशात तसे शक्य नाही. परंतु, हॉर्न कधी वाजवायचे, त्यावर मर्यादा किती असावी, उत्सव-जयंत्या साजऱ्या होताना स्पीकर्स लावल्यावर त्याचा आवाज किती असावा, या बाबतचे नियम आहेत. परंतु, त्यांची अंमलबजावणी होत नाही, ही शोकांतिका. असलेल्या नियमांची जरी अंमलबजावणी झाली तरी, गोंगाटाची समस्या काही अंशी तरी कमी होऊ शकेल.
संगीतकार ए. आर. रेहमान यांचा कार्यक्रम झाला. त्यावेळी २२ मिनिटे उशीर झाला म्हणून पोलिसांनी स्टेजवर जाऊन कार्यक्रम थांबविला. आवाजाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा त्यांनी दाखला दिला. अशीच तत्परता पोलिस एरवी का दाखवत नाही, असा स्वाभाविक प्रश्न पुणेकरांच्या मनात आहे. शासकीय नियमांची अंमलबजावणी झाल्यास आणि विविध सार्वजनिक मंडळे, कार्यकर्ते यांनी धार्मिक कार्यक्रम, जयंत्या, उत्सव साजरे करताना संयम बाळगल्यास पुणेकरांना दिलासा मिळू शकतो. यामध्ये लोकप्रतिनिधी या घटकाचा महत्त्वाचा सहभाग आहे. परंतु, असे प्रश्न निर्माण झाल्यावर या घटकांनी पुढाकार घ्यायला हवा.... पण त्यांनी ते लक्षात घेतले तर !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com