किल्ले पुरंदर

किल्ले पुरंदर

आज छत्रपती संभाजी महाराज यांची तारखेप्रमाणे जयंती आहे. १४ मे १६५७ रोजी सईबाईंच्या पोटी पुरंदर येथे त्यांचा जन्म झाला. अत्यंत कठीण काळात सर्व बाजूने शत्रू चाल करून आला असताना विलक्षण धैर्याने त्यांनी स्वराज्य राखले.
सवाई माधवराव पेशवे यांचा जन्मसुद्धा १८ एप्रिल १७७४ रोजी पुरंदरवर झाला. तेव्हा सुद्धा मराठीशाही अडचणीत होती. पुरंदर म्हणजे इंद्र, पुण्यापासून ४० किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्याचा उल्लेख पुराणात इंद्रनील पर्वत असा आहे, असे म्हटले जाते. इंद्राप्रमाणे आढळत स्थान असलेला म्हणून पुरंदर. बिदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी काळात या किल्ल्याचा ताबा घेतला, असा पहिला उल्लेख सापडतो. त्यांनी पुरंदरच्या पुनर्विमानास सुरुवात केली. येथील शेंद्र्या बुरुज सारखा ढासळत होता, त्यामुळे किल्लेदार बहिरनाथ सोननाक यांनी आपला मुलगा नाथनाक आणि सून देवाकाई अशा दोघांचा बळी दिला, तेव्हा हा बुरुज उभा राहिला, असे म्हटले जाते. हा किल्ला सन १४८९ मध्ये निजामशाही सरदार मलिक अहमद यानी जिंकून घेतला. पुढे आदिलशाहीत हा किल्ला आला. शिवरायांनी १६४९च्या दरम्यान अनेक आदिलशाही किल्ले ताब्यात घेतले. तेव्हा महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखान याला आदिलशहाने पाठवले. त्यावेळी महाराजांनी महादजी निळकंठ याच्या ताब्यातून किल्ला घेतला आणि तिथूनच फत्तेखानचा पराभव केला. पुढे १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग यांच्या बरोबर आलेल्या दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला. गडावर मुरारबाजी देशपांडे होते, त्यांच्याबरोबर दोन हजार सैन्य होते. भर वेढ्यात गडावर साहित्य कमी पडू नये म्हणून महाराजांनी २०० पोती धान्य व दारूगोळा वरती पोहोचवला होता. दिलेरखानाने याचा जोड किल्ला म्हणजे वज्रगड जिंकला आणि मुरारबाजी अत्यंत धडाडीने त्याच्यावर चालून आले. त्याचे शौर्य पाहून दिलेरखानाने त्याला मुघलांकडे येण्याचे सुचवले पण ‘तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय’ असे मुरारजींनी खणखणीत उत्तर दिले. या लढाईत सैन्याच्या संख्येच्या विषमतेमुळे मुरारबाजींचा पराभव झाला आणि युद्धात त्यांना वीरमरण आले. हा किल्ला पडल्याचे कळताच महाराजांनी मिर्झाराजेंपुढे तहाचा प्रस्ताव ठेवला आणि ११ जून १६६५ रोजी ‘पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले मोघलांना द्यावे लागले. ८ मार्च १६७० रोजी निळोपंत मुजुमदाराने किल्ला परत स्वराज्यात आणला. औरंगजेबाने पुन्हा एकदा हा किल्ला जिंकून घेतला, पण शंकराजी नारायण सचिवांनी तो परत स्वराज्यात आणला. शाहू महाराजांनी हा किल्ला पेशव्यांना दिला. अनेक दिवस पेशव्यांची इथे राजधानी होती. सध्या गड मिलीटरीच्या ताब्यात असल्यामुळे राहण्याची, जेवण्याची सोय होण्याआधी त्यांची परवानगी घ्यावी लागते. गडाच्या पायथ्याला सुप्रसिद्ध नारायणपूर येथे दत्त मंदिर आणि नारायश्वर शंकराचे मंदिर आहे.

काय पहाल
गडावर बिनी दरवाजा, पुरंदरेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, मुरारबाजींचा दोन्ही हातात तलवारी घेतलेला पुतळा, पद्मावती तळे, शेन्द्र्या बुरूज, केदारेश्वर देवालय, केदार दरवाजा, राजाळे तलाव, वज्रगड, पाण्याची टाकी, वाड्यांचे आणि अंबार खान्याचे अवशेष.

कसे जाल
पुण्याहून सासवड किंवा केतकावळे मार्गे बसने जाता येते. नारायणपूरपर्यंत बसची सोय आहे, पुढे पायी जावे लागते किंवा खासगी वाहनाने गडापर्यंत जाता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com