इंदापूरसाठी नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचा बोगदा ठरु शकतो वरदान

इंदापूर - नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाचा बोगदा ही इंदापूर तालुक्यासाठी वरदान ठरु शकतो.
इंदापूर - नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाचा बोगदा ही इंदापूर तालुक्यासाठी वरदान ठरु शकतो.

वालचंदनगर - मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नीरा-भिमा नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्यातून ७ टीएमसी पाणी दिल्यानंतर उर्वरित नीरा नदीमधून वाया जाणारे पाणी बोगद्यामधून उपसा सिंचन योजनेद्वारे इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी वापरणे शक्य असून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलेल. नीरा-भीमा जोडप्रकल्पाचा बोगदा ही इंदापूर तालुक्यासाठी वरदान ठरण्यास मोलाची मदत होणार असल्याने बोगद्यातून उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नीरा खोऱ्यातील धरणे फुल्ल भरल्यानंतर दरवर्षी  नदीमधून सरासरी २५ टीएमसी पाणी नीरा नदीमध्ये सोडले जाते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी नीरा-भिमा नदी जोड प्रकल्पाचे काम वेगात सुरु असून इंदापूर तालुक्यामध्ये भवानीनगर जवळील ३६ फाटा, सणसर,शिंदेवाडी, अकोले- १,अकोले-२, भादलवाडी मध्ये जमीनीच्या ४० ते ८३ मीटर खाेल विहीर (शॉप्ट) खोदले असून बोगद्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत १३ कि.मी पेक्षा जास्त लांबीमध्ये बोगद्याचे काम पूर्ण झाले असून दोन ठिकाणचे बाेगदे एकमेकांना जोडले आहेत. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर  पावसाळ्यामध्ये नीरा नदीमधून वाहून जाणारे ७ टी.एम.सी पाणी ४३ दिवसामध्ये १८७२ क्युसेक विर्सगाने भीमा नदीमध्ये सोडण्यात येणार असून मराठवाड्याला देण्यात येणार आहे.  मराठवाड्याच्या पाण्याचा कोठा पूर्ण झाल्यानंतर नीरा नदीमधून वाहून जाणाऱ्या पाण्याचा  उपयोग इंदापूर तालुक्यासाठी शेतकऱ्यांसाठी होवू शकतो.

बोगद्यासाठी सध्या आठ ठिकाणी मोठ्या विहिरी (शॉप्ट) खोदल्या असून भवानीनगर व सणसर जवळच्या शॉप्टमधून नीरा डाव्या कालव्यामध्ये तसेच सणसर कट च्या कालव्यामध्ये पाणी टाकून व  अकोलेजवळील शॉप्टमधून खडकवासला कालव्यात सहज पाणी टाकले जावू शकते. तसेच भादलवाडीमधील शाॅप्टमधून भादलवाडी तलावामध्ये पाणी सोडणे शक्य असून उजनीचे अतिरिक्त पाणीही बोगद्याद्वारे उलट प्रवाहाने अकोल्यापर्यंत येवू शकते. दोन्ही कालव्याच्या माध्यमातून  संपूर्ण इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी पाण्याचा उपयोग होण्यास मदत होणार आहे. बोगद्यातून डायरेक कालव्यात पाणी येणार असल्यामुळे पाणी गळती व पाण्याची चोरीही कमी होवून कमी दिवसामध्ये जास्त सिंचन करणे पाटबंधारे विभागास शक्य आहे.

इंदापूरचा चेहरा-मोहरा बदलेल...
सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असून अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद व   जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. तसेच दत्तात्रेय भरणे हे मंत्रीमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करीत आहेत. शासकीय पातळीवर पाठपुरावा करुन नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्यातुन उपसा सिंचन योजना राबविल्यास इंदापूरचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटण्यास मोलाची मदत होणार असून तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com