पुणे : पावसाळ्या आधी नाले आणि गटार साफ करण्यासाठी, १४६ पाणी तुंबणारे ठिकाणी उपाय योजना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात बैठक घेऊन पावसाळा पूर्व कामाची तयारी सुरू केल्याचा दावा केला होता.
पण शहरात अवघा पाऊणतास अवकाळी पाऊस झाला आणि त्या दाव्याची पोलखोल झाली. कोथरूड मध्ये गेल्यावर्षी ज्या भागात पाणी साचले होते, पुन्हा त्या ठिकाणी पाणी जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पावसाळ्यापूर्वी सुमारे २० कोटी रुपयांची निविदा काढून मे महिन्यात महापालिकेकडून नाले सफाई, गटारांची स्वच्छता केली जाते. तरीही पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी आॅक्टोबर मध्ये शहरात झालेल्या पावसामुळे मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील नाल्यांना, रस्त्यांना रस्त्याचे स्वरूप आले होते.
अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने प्रकार घडले होते. त्यानंतर पुन्हा पाणी तुंबणार नाही यासाठी उपाय योजना केल्या जातील असा दावा आयुक्त विक्रम कुमार यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात आयुक्तांनी पावसाळापूर्व तयारीची बैठक घेतली होती.
त्यामध्ये मेट्रोच्या कामासह इतर कारणांमुळे शहरात जेथे जेथे पाणी तुंबते तेथे दुरुस्ती करा असे आदेश दिले होते. पण ही बैठक होऊन एक महिना होण्याच्या आतच अवकाळी पाऊस झाला आणि शहरात सुधारणा झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले.
बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे टिळक रस्ता, हिराबाग चौक, लाल महालपासून पुढे शिवाजी रस्त्याचा भाग, टिळक चौक डेक्कन जिमखाना भागात पाणी जमा झाले होते. त्यानंतर आज (गुरुवारी) दुपारनंतर अवघा अर्धा ते पाऊण तास शहराच्या विविध भागात पाणी तुंबले. यामध्ये गेल्यावर्षी पौड फाटा केळवाडी,
शिवतीर्थ नगर, कोथरूड कचरा डेपो या भागात मेट्रोच्या दुभाजकामुळे पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने दीड ते दोन फूट पाणी तुंबले होते. याचे व्हिडीओही सोशल मिडियावर व्हायरल झाले. गेल्यावर्षी देखील या भागात हीच स्थिती होती. त्यामुळे कोणत्याही सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवार पेठेतील अमृतेश्वर मंदिर येथेही पाणी तुंबू नये यासाठी उपाय योजना केली नाही.
पावसाळी गटार सफाइची निविदा संपली
पावसाळी गटार सफाईसाठी मलनिसाःरण विभागाकडून काढलेली निविदा ही संपली आहे. आता एप्रिल महिन्यात नव्याने निविदा काढली जाईल, त्याचीही मुदत अवघ्या सहा महिन्याची असणार आहे. त्यामुळे आॅक्टोबनंतर शहरात शहरात पावसाळी गटारांची स्वच्छता होत नसल्याचे समोर आले आहे.
‘‘मेट्रोच्या कामामुळे ज्या भागात पाणी तुंबते, तेथे पाणी वाहून जाण्याची सुविधा करावी असे मेट्रोला कळविण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा पत्र पाठवून दिले जाईल. तसेच पावसाळी गटार साफ करण्याचे काम मलनिःसारण विभागाकडे आहे.’’
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.