पुणे - 'हिंदू-मुस्लिमांमधील मतभेद दूर करण्यासाठी उर्दू साहित्य मराठीत अनुवादित झाले पाहिजे. उर्दू वाङ्मय मराठीत आले, तर मुस्लिमांच्या आशा-आकांक्षाही आपल्याप्रमाणेच आहेत, याची जाणीव होईल. त्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजातील दरी कमी होण्यास मदत होईल,'' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. आंतर भारतीतर्फे देशमुख यांच्या हस्ते उमा कुलकर्णी, मिलिंद चंपानेरकर, अरविंद दीक्षित, प्रमोद मुजुमदार, गणेश विसपुते, प्रशांत तळणीकर, आसावरी काकडे, जयंत गुणे, गोरख थोरात, डॉ. दामोदर खडसे, गजानन चव्हाण या अनुवादकांचा सत्कार करण्यात आला. आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सदाविजय आर्य, डॉ. डी. एस. कोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 'साने गुरुजींनी एकात्मतेचे स्वप्न पाहिले होते. भाषा भगिनींमध्ये संवादाचा पूल बांधला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. परंतु, आज प्रांतिक अस्मिता टोकाची झालेली आहे. त्यामुळे भाषिक संवाद न होणे ही चिंतेची बाब बनली आहे,'' असेही देशमुख यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र माने यांनी केले. |