पुणे : ‘‘कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आर्थिक विवंचना आणि कर्जवसुलीच्या प्रक्रियेमुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर कर्ज घेऊ इच्छिणारे आणि कर्ज मंजूर करणाऱ्या वित्तीय संस्थांनी व्यावहारिकता पाहून कर्ज दिल्यास अशा घटना टाळता येतील,’’ असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
अनास्कर म्हणाले, ‘‘देसाई हे माझे स्नेही होते. त्यांच्या आत्महत्येमुळे अतीव दु:ख झाले. बऱ्याचदा संबंधित कर्जास उपलब्ध तारण आणि त्याचे मूल्य पाहून कर्ज दिले जाते. परंतु त्या कर्जाच्या विनियोगातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा बारकाईने विचार केला जात नाही.
‘पाहिजे तेव्हा म्हणजे योग्य वेळी आणि आवश्यक तेवढाच कर्जपुरवठा’ ही कर्जाची खरी द्विसूत्री आहे; मात्र वित्तीय संस्थांकडून याबाबत निष्काळजीपणा होत असल्याचे दिसून येते. यामुळे देसाई यांच्यासारख्या हळव्या मनाच्या व्यक्तींना अशा परिस्थितीचा सामना करताना नैराश्य येते व त्यातून अशा दु:खद घटना घडतात.’’
‘कर्ज थकीत झाल्यानंतर वसुलीसाठी तारण मालमत्तेची जप्ती आणि विक्री हा एकमेव पठाणी मार्ग अवलंबू नये. वित्तीय संस्थांनी त्या उद्योगास प्रथम ‘आजारी उद्योग’ जाहीर करून त्याची पुनर्बांधणी करावी.
कर्जाची परतफेड ही उत्पन्नातूनच होण्यासाठी कर्जदारास सक्षम बनविण्याची जबाबदारी वित्तीय संस्थांनी घ्यावी. पठाणी जप्ती-विक्री हा शेवटचा पर्याय ठेवल्यास अशा घटनांना आळा बसेल. नीरव मोदी,
मल्ल्यासारखे अनेक कर्जदार कोट्यवधींचे कर्ज बुडवून देशाबाहेर मजेत राहतात, तर कला क्षेत्रात भव्यदिव्य करण्याचे स्वप्न उराशी बाळगून कर्ज उभारणी करणारा एक मनस्वी मराठी कलावंत आर्थिक विवंचनेमुळे जीवन संपवतो, यावर बँकिंग क्षेत्राने विचारमंथन करणे महत्त्वाचे ठरेल,’’ असे अनास्कर यांनी नमूद केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.