सशक्त गावासाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार!

Doctor
Doctor

भवानीनगर - केवळ शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या असांसर्गिक आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी जिल्हा परिषदेबरोबरच ग्रामपंचायतीही आता पुढाकार घेणार आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका गावातील ३० वर्षांवरील स्त्री-पुरुषांची रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करणार आहेत.

सरकारकडून चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या एकूण निधीच्या आठ टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करण्याची मुभा ग्रामपंचायतींना दिली आहे. त्याची आठवण जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना करून दिली. जिल्हा परिषदेने नुकतेच अनंत दीर्घायू योजनेला मंजुरी दिली आहे. त्याला पूरक असे काम ग्रामपंचायतींकडून होणार आहे. आरोग्यासाठीच्या आठ टक्के निधीतून ग्रामपंचायती गावातील आशा स्वयंसेविकांना डिजिटल बीपी ऑपरेटर, ग्लुकोमीटर, ग्लुकोस्ट्रीप, प्रिकर्स व रजिस्टर उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना एक फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दिली आहे. राज्यातील बहुतांश ग्रामपंचायती या आठ टक्के निधीतून आरोग्य शिबिर, औषध फवारणी, किशोरवयीन मुलींची तपासणी करतात. सरकारी पातळीवरूनही ही कामे होतात. त्यामुळे आता त्यापलीकडे जात गंभीर स्थितीकडे ग्रामपंचायतींनी हे मूलभूत सुविधेचे काम म्हणून पाहावे आणि त्यातून वयाची तिशी ओलांडलेल्या दर हजारी ४०० लोकांच्या आरोग्याचा प्रश्न हाती घ्यावा, असे सुचवलेले आहे. या साठी प्राथमिक तपासण्या आशा स्वयंसेविकांमार्फत करून ज्यांना आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत आहेत, त्यांच्यावर उपचाराची प्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्रांनी करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेने द्याव्यात, असे सुचवले आहे. याकरिता आशा स्वयंसेविकांना या कामासाठी रक्तदाब मोजल्यानंतर व साखर तपासल्यानंतर प्रतिव्यक्ती १० रुपये मानधन देण्याचीही सूचना जिल्हा परिषदेने दिली आहे.

जिल्ह्याच्या आरोग्यासाठी नवी आशा - माने
या संदर्भात जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील मधुमेह व हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. ते लक्षात घेता ग्रामपंचायतींच्या पातळीवर आशा स्वयंसेविकांमार्फत ही योजना राबविल्यास जिल्हा असांसर्गिक आजारांनाही नियंत्रित करण्याच्या मोहिमेला गती मिळेल, अशी आशा आहे. अनंत दीर्घायू योजना आता सुरू झाली असून त्याला ही योजना पूरक ठरणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी तातडीने पावले उचलावीत व गावातील तिशीच्या वरच्या ग्रामस्थांच्या आरोग्याला हातभार लावावा.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com