पुणे : शहरात पाणी टंचाईमुळे नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याची नामुष्की आली आहे. महापालिकेला जर पुरेसे पाणी देता येत नसेल तर त्यांनी टँकरचा खर्च नागरिकांना द्यावा अशी मागणी करत आम आदमी पक्षाने (आप)बालगंधर्व चौक येथे आंदोलन केले.
पुणेकरांकडून पाणी पट्टी वसूल केली जात असल्याने त्यांना पुरेसे पाणी पुरविणे हे महापालिकेची जबाबदारी आहे. शहराच्या विविध भागात पाणी टंचाई आहे, वेळी अवेळी पाणी येत असल्याने भर उन्हाळ्यात नागरिक हैराण झाले आहेत. याविरोधात आम आदमी पक्षाने पाणी टंचाई व टँकर माफियांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी राज्य संघटक विजय कुंभार, डॉ. अभिजित मोरे, सुदर्शन जगदाळे, आबासाहेब कांबळे, श्रीकांत आचार्य, मंजूषा नयन आदी सहभागी झाले होते.
महापालिका पाणी देत नसल्याने नागरिकांना टँकर घ्यावे लागत आहे. पण या टँकरच्या दरावर महापालिकेचे नियंत्रण नाही, टँकर माफिया नागरिकांना अव्वाच्या सव्वा दराने पाणी देत आहेत. पाणी पिणेही अवाक्याच्या बाहेर जात आहे. त्यामुळे महापालिकेने एक तर पाणी द्यावे किंवा टँकरचा खर्च नागरिकांना द्यावा अशी आमची भूमिका आहे, असे कार्याध्यक्ष विजय कुंभार, अभिजित मोरे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.