सिंहगड - पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर गावच्या हद्दीत काम सुरू असलेल्या पुलाच्या सेवा रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने मालखेड, वरदाडे, निगडे, ओसाडे ,सोनापूर, आंबी व पानशेतसह वेल्हे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेक नागरिक व विद्यार्थी अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मुळ पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यासाठी काम सुरू केले आहे.
खानापूर येथील पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी वाहतुकीसाठी सिमेंट पाईप टाकून सेवा रस्ता सुरु करण्यात आलेला होता. आज परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने सदर ओढ्याला पूर आला असून पाणी पर्यायी वाहतुकीसाठी तयार केलेल्या कच्च्या पुलावरुन वाहत आहे. परिणामी पाबेकडे जाणारी व पुढे पानशेतकडे जाणारी पूर्ण वाहतूक बंद झाली आहे. जवळच असलेल्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थीही अडकून पडले आहेत. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या असून मूळ पूल वाहतुकीसाठी सुरू होण्यास दोन ते तीन तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
"अनेक वेळा अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करुन घेण्यास सांगितले होते. पर्यायी रस्ता नसल्याने याचे गांभीर्य सार्वजनिक बांधकाम विभागाने अगोदरच लक्षात घ्यायला हवे होते. चुकीच्या पद्धतीने केलेल्या रस्त्याच्या कामामुळे खानापूर गावातही दुकानांमध्ये पाणी शिरत आहे."
- निलेश जावळकर, माजी सरपंच, खानापूर.
"मुळ पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी तातडीने भर टाकून घेण्याचे काम सुरू आहे. थोड्याच वेळात वाहतूक सुरळीत होईल. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे पुलावरुन आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत."
- ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.