कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; लवकरच सुटणार पाणी

कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; लवकरच सुटणार पाणी
Updated on

नारायणगाव : कुकडी प्रकल्पा अंतर्गत  धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या  सिंचनासाठी पहिल्या टप्प्यात एक फेब्रुवारी पासून कुकडी डावा कालव्यात तर दहा फेब्रुवारीपासून पिंपळगाव जोगे व इतर कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. वहनव्यय, गळती, बाष्पीभवन आदींचा विचार करता कुकडी प्रकल्पातून चाळीस दिवसात ७.२० टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून या पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात तालुक्यातील १ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांच्या सिंचनासाठी होणार आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके, कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, संजय शिंदे, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक विलास रचपुत आदी उपस्थित होते.

कुकडी प्रकल्पात आज अखेर  २१.५३ टीएमसी(७२.५६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी प्रकल्पात आज अखेर २७.७३ टीएमसी(९३.४६  टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रकल्पात ६.२० टीएमसी(२०.९० टक्के) कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने रब्बी अवर्तनाच्या नियोजनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.

या बाबत कार्यकारी अभियंता कडूसकर म्हणाले एक फेब्रुवारी पासून येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात होणार असून चाळीस दिवसांत  ४.२० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. येडगाव धरणात डिंभे डावा कालव्याव्दारे पाणी घेण्यात येणार आहे. दहा फेब्रुवारी पासून पिंपळगाव जोगे, मीना शाखा व इतर कालव्यात पाणी २.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.आवर्तन कालावधीत कालव्यातुन पाणी चोरी करणारावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. या वेळी मीना, कुकडी व घोड नदीवरील सुमारे ६९ कोल्हापूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याची आग्रही मागणी कामगारमंत्री वळसे पाटील यांनी केली. या साठी किमान दोन टीएमसी पाणीसाठा आवश्यक असल्याचे वळसे पाटील यांनी  
सांगितले.

आमदार बेनके म्हणाले, ''कुकडी प्रकल्पात कमी पाणीसाठा असल्याने पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठा वापरला जाणारा नाही. वडज धरणातील पाण्याचा वापर मीना, वडज कालव्यासाठी व मीना दिसाठी केला जाईल. जुन्नर शहर व परिसराला पिण्यासाठी माणिकडोह धरणात दीड टीएमसी उपयुक्त पाणीसाठा राखून ठेवला जाईल. अशा पद्धतीने काटेकोर नियोजन केले आहे. नियोजनानुसार १२ मार्चपर्यंत आवर्तन पूर्ण होईल. आवर्तन पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठीच राखून ठेवण्यात येणार आहे.'' 

आज अखेर धरण निहाय शिल्लक उपयुक्त पाणीसाठा टीएमसी,(कंसात टक्के):येडगाव :१.७९ (९२.३३ टक्के),माणिकडोह: ४.६६ (४५.७८ ), वडज: १.१३ (९६.३५ ), डिंभे :१२.१५७ (९७.३१), पिंपळगाव जोगे: १.७८(४५.९९)

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com