लायकी नसताना कर्ज का घेतले?

LOan
LOan

पुणे - लायकी नाही तर कर्ज घेतले कशाला, आमच्या विरोधात तक्रार करून काय साध्य होणार, आम्ही तुम्हाला बघून घेऊ, अशा भाषेत फायनान्स कंपन्यांनी कर्जाच्या हप्त्यांची बेकायदा वसुली सुरू केली आहे. याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या निर्देशांना फायनान्स कंपन्यांनी हरताळ फासले असून, अरेरावी करून हप्ते वसुलीचा धडाका लावला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून, उद्योग-व्यवसायही ठप्प झाला आहे. नोकरदारांना कामावरून काढणे, सक्तीच्या रजेवर पाठवणे किंवा पगार कपात करणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते सप्टेंबरपर्यंत न भरण्याची सवलत ‘आरबीआय’ने दिली आहे. मात्र असे असताना कर्ज वसुली करणाऱ्या बाबूंकडून कर्जधारकांना पैशासाठी फोन केले जात आहेत. एवढेच नाही तर हप्ता दिला नाही तर अगदी त्यांची लायकी काढली जात आहे. 

वसुलीवर मिळते टक्केवारी  
कर्जाच्या हप्त्याची वसुली करण्याची जबाबदारी बऱ्याचदा फायनान्स कंपन्यांकडून खासगी व्यक्तींना दिलेली असते. हे लोक जेवढे वसुली करतात, त्यानुसार त्यांना टक्केवारीवर पैसे दिले जातात. त्यामुळे जास्त टक्केवारी मिळविण्याच्या नादात ही मंडळी साम-दाम-दंड-भेद वापरून कर्ज वसुलीच्या मागे लागलेले असतात.

महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक  
फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात जो कर्जदार पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे किंवा ‘आरबीआय’ने दिलेल्या निर्देशांचा उल्लेख करीत असेल त्याची बोलती बंद करण्यासाठी महिला कर्मचारी त्याकडे पैशाची मागणी करतात. एखादी महिला उर्मट भाषेत कर्जाचे हप्ते मागत असेल तर उगाच वाद नको म्हणून बऱ्याचदा कर्जदार पैसे भरून टाकतात.

अशी घ्या खबरदारी  

  • कंपनी प्रतिनिधीचा कॉल रेकॉर्ड करावा
  • त्यांना ‘आरबीआय’चे नियम सांगावेत
  • सप्टेंबरपर्यंत पैसे देणार नसल्याचा मेल करावा
  • अरेरावी केल्यास पोलिसांत तक्रार द्यावी
  • झालेला प्रकार कंपनीला मेलद्वारे कळवावा 
  • वसुलीसाठी घरी कोणाला येऊ देऊ नका

‘आरबीआय’च्या नियमाप्रमाणे सप्टेंबरपर्यंत कोणालाही कर्जाचा हप्ता मागता येत नाही. तसेच थेट खात्यातून पैसे कापणे बेकायदा आहे. त्यामुळे कर्जदार संबंधित कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो किंवा ग्राहक मंचात  न्याय मागू शकतो.  
- ॲड. वाजेद खान-बिडकर

पैसे भरण्यासाठी मला रोज किमान १० कॉल व मेसेज येत आहेत. मी दिलेले चेक त्यांनी बॅंकेत भरले. ते बाऊन्स झाल्याने मला तीन हजार रुपयांचा फटका बसला. हप्ता दिला नाही तर त्याला व्याज लागेल, असे सांगितले जात आहे. 
- फिरोज शेख, कर्जदार

माझ्या दुचाकीचे चार हप्ते बाकी असून, ते लवकर भरा, अशी मागणी करणारे कॉल सध्या सुरू आहेत. पैसे भरले नाही तर गाडी घेऊन जाऊ, अशी धमकी मला देण्यात आली. 
- सुधीर शेळके, कर्जदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com