CAA : 'नागरिकत्त्व'वरून यशवंत सिन्हा बरसले केंद्रावर; म्हणाले...

CAA : 'नागरिकत्त्व'वरून यशवंत सिन्हा बरसले केंद्रावर; म्हणाले...

पुणे : एनआरसी आणि सीएए हा काळा कायदा असून, तो मागे घ्यावा ही मागणी घेऊन गांधी शांती यात्रा आम्ही सुरू केली आहे. संविधान रक्षण करणे, एकतेचा संदेश देणे आणि गांधीजींना पुन्हा मरू न देणे, हा हेतू त्यामागे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

'गेट वे ऑफ इंडिया' (मुंबई) ते राजघाट (दिल्ली) या मार्गावर आज (ता.9) सुरू झालेली गांधी शांती यात्रा आजच सायंकाळी पुण्यात आली. गांधीभवन येथे डॉ. कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, शिवाजीराव कदम, अभय छाजेड यांनी स्वागत केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत यशवंत सिन्हा बोलत होते. या पत्रकार परिषदेत अभिनेते, नेते शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ कुमार सप्तर्षी, आशिष देशमुख उपस्थित होते. 

यशवंत सिन्हा म्हणाले, 'गांधीजींच्या विचारांच्या विरोधात काम सुरू आहे. सीएए हा कायदा काळा आणि विभाजनवादी आहे. संसदेत नागरिकत्व कायदा मागे घ्या ही मागणी आहे. एनआरसी लागू करणार, घुसखोरांना हाकलणार हे गृहमंत्र्यांचे शब्द होते. भय निर्माण झाले आहे. सरकार याला धार्मिक रंग देऊ पाहत आहे. सरकारपुरस्कृत हिंसा विद्यापीठात होत आहे. या दोषींवर कारवाई झाली पाहिजे.

तसेच 21 दिवसांची गांधी शांती यात्रा या मागण्यांसाठी आहे. राजघाटवर 30 जानेवारीला सर्व समाजातील घटक एकत्र येणार आहे. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. देशाची जनता आजही गांधींजींसमवेत आहे. संविधान रक्षणाची शपथ 'गेट वे ऑफ इंडिया'वर आम्ही घेतली. शांती, एकतेचे संदेश घेऊन आम्ही यात्रेवर आहोत.

शांतता धोक्यात : पृथ्वीराज चव्हाण

'देशाविरुद्ध काम सध्या चालू आहे. शांतता धोक्यात आणली जात आहे.  देशाला याची किंमत मोजावी लागत आहे. छुपा अजेंडा पुढे आणला जात आहे. गांधींचा विचार मारण्याचे कारस्थान चालू आहे. राजकीय विचारांच्या पुढे जाऊन संविधान विचाराची लढाई लढण्याची गरज आहे.'

नियुक्त्या रद्द कराव्या : देशमुख

विद्यापीठ कुलगुरू आणि इतर नियुक्त्या या संघ विचारांच्या व्यक्तींच्या झालेल्या आहेत. त्यामुळे या सर्व नियुक्त्या रद्द कराव्या, असे आशिष देशमुख म्हणाले.

पंतप्रधानांनी विश्वासार्हता गमावली : शत्रुघ्न सिन्हा

देशाची युवाशक्ती आज अशांत आहे. पुन्हा जयप्रकाश नारायण यांची चळवळ सुरू असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. काही लोकांच्या अहंकारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या भाषणात अभिनय आहे. पोकळपण आहे. ते बोलतात एक, करतात भलतेच. सर्वधर्मीय आज एकत्रपणे संविधान रक्षणासाठी आंदोलनात उतरले आहेत.

पुण्यावर कोणी मालकी सांगू नये : डॉ. सप्तर्षी

पुण्यावर कोणी मालकी सांगू नये. येथील सामाजिक सर्वसमावेशक वातावरण आम्ही जीवंत ठेऊ. हिटलरच्या मार्गाने जाणाऱ्यांसाठी आत्महत्या हा शेवटचा मुक्काम असतो. तसेच आता माध्यमांनी सत्याला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com