Punjab Election: विकासापेक्षा भावनिक मुद्दे; कृषी सुधारणांच्या मुद्द्यांना बगल

विकासापेक्षा भावनिक मुद्द्यांवर या निवडणुकीचे वातावरण तापत गेले. यात कृषी सुधारणांच्या मुद्द्यांना सगळ्याच पक्षांनी अलगद बगल दिली.
Punjab Election
Punjab ElectionSakal

पुणे : काँग्रेस-आम आदमी पक्षाचे आरोप-प्रत्यारोप, अकाली दलाचा नेटाने प्रचार आणि भाजपने शेवटच्या टप्प्यात लावलेली ताकद यामुळे ढवळून निघालेल्या पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. विकासापेक्षा भावनिक मुद्द्यांवर या निवडणुकीचे वातावरण तापत गेले. यात कृषी सुधारणांच्या मुद्द्यांना सगळ्याच पक्षांनी अलगद बगल दिली. (Punjab Assembly Election Updates 2022)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना देशात पंजाबमधून प्रखर विरोध झाला. केंद्राला कायदे मागे घ्यावे लागले. त्यामुळे निवडणुकीत भाजपला फटका बसेल, अशी सुरवातीला चिन्हे होती. परंतु, निवडणुकीत सगळ्याच पक्षांच्या प्रचारात कृषी सुधारणांचा मुद्दा फारसा उमटला नाही. काँग्रेस, अकाली दल, भाजपने शेतकऱ्यांसाठी थोड्या फार घोषणा केल्या परंतु, त्यांनी त्यांचे समाधान झाले नाही. महिलांना दरमहा निधी, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे स्थलांतर आदी विषय सुरवातीच्या टप्प्यात होते.

Punjab Election
Pune Election: प्रभागरचनेवर होणार २४ व २५ फेब्रुवारीला सुनावणी

काँग्रेसने चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केल्यावर निवडणुकीच्या दुसऱ्या अंकाला सुरवात झाली. चन्नी वाळू माफिया असल्याची टीका अकाली दलाने केली तर, चन्नी यांच्या १११ दिवसांच्या कार्यकाळातील योजनांची चौकशी करण्याचे आश्वासन ‘आप’चे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले. ‘आप’ने भगवंतसिंह मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केल्यावर काँग्रेस, अकाली दलाने त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल करण्याची खेळी केलीच शिवाय बाहेरचा पक्ष म्हणूनही ‘आप’ची संभावना केली. या रणधुमाळीत मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, बसपच्या मायावती यांच्यासह बहुतेक पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात भाग घेतला. तर, सच्चा डेराचा बाबा राम रहीमला संचित रजा देण्याची खेळी भाजपने खेळली.

काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. कॅप्टन अमरिंदरसिंग मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यावर पक्षाला सोडचिठ्ठी देत पंजाब लोककाँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि भाजपसोबत अकाली दलाच्या एका छोट्यागटासह आघाडी केली. तर, अकाली दलाने बहुजन समाज पक्षाशी आघाडी केली. विधानसभेच्या मागच्या निवडणुकीतही ‘आप’ प्रचारात आघाडी घेतली होती. परंतु, विजयी जागांमध्ये त्याचे रूपांतर झाले नव्हते.

यंदाही ‘आप’बद्दल मतदारांना कुतूहल असून त्यांच्या उमेदवारांना शहरी भागात प्रतिसाद मिळत आहे. तर, चन्नी यांच्या निवडीमुळे नवज्योतसिंग सिद्धू नाराज झाले असले तरी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत समाधान आहे. चन्नी यांच्या दलित चेहऱ्यावर काँग्रेसची भिस्त असली तरी ॲन्टिइन्कमबन्सीचा फटका काँग्रेसला बसू शकतो. ग्रामीण भागांतील काही पट्ट्यांत अकाली दल- बसप आघाडीचीही हवा जाणवली.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यास विलंब

पंजाबमध्ये काँग्रेस, अकाली दल- भाजप आघाडी आलटून पालटून सत्तेवर होते. मतदारांना आता बदल हवा आहे. यंदा ‘आप’च्या माध्यमातून बदल करणार का, याबद्दल पंजाबमध्ये कुतूहल आहे. प्रचार संपण्यापूर्वी दोन दिवस अगोदर काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या बद्दलही मतदारांत नाराजी उमटत आहे. काँग्रेस, आप वगळता अन्य पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता कमी असली तरी, पंजाबमध्ये यंदा बदल होण्याचे वारे वाहत असल्याचे चित्र असले तरी, त्याचा उलगडा १० मार्चला होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com