Punjab Election : केजरीवालांची स्ट्रॅटेजी पंजाबमध्ये सक्सेसफुल!

पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत ११७ जागांपैकी सुमारे ९० जागा आप ने जिंकल्याचे स्पष्ट
Punjab Election
Punjab Election

Punjab Election : कोणत्याही एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला नव्हता, त्यापेक्षा जास्त जागा मिळविण्याची किमया आम आदमी पार्टीने (आप) पंजाबमध्ये साधली, त्या मागे अरविंद केजरीवाल यांचे स्ट्रॅटेजी कारणीभूत ठरल्याचे गुरुवारी लागलेल्या निवडणुकांत दिसून आले. उमेदवारांची निवड करण्यापासून प्रचाराचे तंत्र निश्चित करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींवर केजरीवाल यांनी घातलेले व्यक्तिशः लक्ष आणि एकहाती नियोजन पंजाबमधील ‘आप'च्या दिमाखदार विजयाला कारणीभूत ठरले.(Punjab Assembly Election)

पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत ११७ जागांपैकी सुमारे ९० जागा आप ने जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूकपूर्व काळात राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी या निवडणुकीत आपला ५५- ६० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, पंजाबमध्ये निवडणुकीसाठी फिरत असताना, आप सर्वाधिक जागा मिळविणारा, पक्ष ठरेल, याची चिन्हे दिसत होती. दिल्लीमध्ये आपची सत्ता आहे. तेथील विकास कामांची केजरीवाल यांनी जाणीवपूर्वक प्रसिद्धी पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वीपासूनच केली होती. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना केजरीवाल यांनी जाणीवपूर्वक पिण्याच्या पाण्यापासून राहण्यासाठी तंबूंची मदत केली होती. त्या वेळी कॉंग्रेसमध्ये फाटाफूट सुरू होती. तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पदावरून काढल्यावर त्यांचे प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू यांना कॉंग्रेसने पाठबळ दिले. त्यामुळे सिद्धू यांची महत्त्वाकांक्षा वाढली. परिणामी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष वाढला. त्यातच अकाली दलाने भाजपबरोबर युती तोडली. या घडामोडींचा फायदा केजरीवाल यांनी उठविला. निवडणूक घोषित होण्यापूर्वीच त्यांनी प्रचाराची मोहीम राबविण्यास सुरवात केली. त्यासाठी सोशल मीडियावर लक्ष दिले. दिल्लीहून खास टिम त्यांनी पंजाबमध्ये चंदीगडमध्ये पाठविली. तसेच दिल्लीतील कार्यकर्त्यांची कुमकही त्यांनी पंजाबमध्ये रवाना केली.

उमेदवारांची निवड करताना त्यांनी त्यांची निवडून येण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रीत केले. त्यानुसार उमेदवारांना स्ट्रॅटेजी पुरविली. मतदारसंघनिहाय प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करताना दिल्लीतील मुहल्ला क्लिनिक पंजाबमध्ये निर्माण करण्याची घोषणा त्यांनी केली. पंजाबमधील शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी विजेचे दर हा कळीचा मुद्दा होता. त्यासाठी पहिले ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा त्यांनी जाहिरनाम्यात केली. पुढील ३०० युनिट सवलतीच्या दरातही देण्याचेही त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि २४ तास नियमित वीज पुरवठा, या मुद्द्यांवर केजरीवाल यांनी रान उठविले. तसेच इतर पक्षांचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार निश्चित नसताना खासदार आणि प्रसिद्ध कॉमेडीयन भगवंतसिंह मान यांचे नाव केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले.

त्यामुळे कॉंग्रेसलाही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून चरणजितसिंह चन्नी यांचे नाव जाहीर करावे लागले. त्यातून कॉंग्रेसचे गणित पुन्हा बिघडले आणि नाराज झालेले सिद्धू प्रचारापासून अलिप्त झाले. ते देखील आपच्या पथ्यावर पडले. प्रचाराच्या संपूर्ण काळात केजरीवाल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवार व्यक्तिगत टिका करण्याचे टाळले. कॉंग्रेस, भाजप आणि अकाली यांची राजकीय फिलॉसॉफी एकच आहे, हे मतदारांच्या मनावर उमटविण्यात केजरीवाल, आपचे पंजाबचे सहप्रभारी राघव चड्डा यशस्वी ठरले. परिणामी पंजाबमध्ये आपने दैदिप्यमान विजय संपादन केला आणि राष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com