
‘...तो महाराष्ट्र भी तैयार है’: शरद पवार
मुंबई : ‘‘विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच, पण हा बदल काँग्रेसला धक्का देणारा आहे,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी गुरुवारी बोलताना व्यक्त केले आहे. भाजपकडून आता ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ असे बोलले जात आहे यावर पवार यांनी ‘अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’ असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी यावेळी देत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.
लोकशाहीत लोकांनी कौल दिला त्याचा स्वीकार व सन्मान करायला हवा अशी भूमिकाही त्यांनी मांडली. ते म्हणाले, ‘‘पंजाब असे एक राज्य होते, ज्याठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळे चित्र बघायला मिळत आहे. आम आदमी पक्ष हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. त्याने दिल्लीत गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले, ज्या पद्धतीने प्रशासन दिले, त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. दिल्लीच्या कामाचा लाभ पंजाबमध्ये ‘आप’ला झाला, असे स्वच्छ दिसते. त्यामुळे पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी लोकांनी जे सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली व भाजपचे राज्य स्थापन झाले आहे.’’
किमान समान कार्यक्रमावर चर्चा
शरद पवार म्हणाले, ‘‘देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. संसदेचे अधिवेशन १४ मार्च पासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. पुढची नीती ठरवण्याची पावले उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे.’’
Web Title: Sharad Pawar On Punjab Election Result
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..