

Impact of Artificial Intelligence on Indian IT sector stocks
esakal
नवी दिल्लीत अलीकडेच भारत सरकारने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात ‘एआय’विषयीची जागतिक पातळीवरची एक परिषद भरवली. यात ‘एआय’मधील दिग्गज लोकांनी हजेरी लावल्यामुळे तिला खूप महत्त्व देण्यात आले. यातून नेमके काय साध्य झाले, याविषयी बरीच चर्चा झाली. एका विद्यापीठाने चिनी यंत्रमानवाची चोरी करून तो आपल्या नावावर ढापण्याचा केलेला अश्लाघ्य प्रकार उघडकीला आल्यामुळे तो चेष्टेचाही विषय झाला. या सर्व गोष्टी मान्य करून आणि यशापयशाच्या दोन्ही बाजू स्वीकारून गुंतवणूकदारांच्या दृष्टीने या परिषदेकडे; तसेच या क्षेत्राकडे नेमके कसे बघायला हवे, यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.
अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या संज्ञेवाचून जगात दुसरे काही जणू घडतच नाही, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. जिथे-तिथे ‘एआय’मुळे काय घडू शकते, कोणत्या प्रकारचे रोजगार धोक्यात येत आहेत, नेमक्या कोणत्या कंपन्यांसमोर बिकट परिस्थिती येण्याची दाट चिन्हे आहेत, नव्या संधी कोणाला मिळू शकतात, अशा अनेक गोष्टींविषयीची चर्चा सतत सुरू असते. जगभर ‘एआय’विषयी असंख्य लोक बोलत असतात. अर्थात, यातून सर्वांच्या मनात एक प्रकारचा गोंधळसुद्धा निर्माण होतो. याचे कारण म्हणजे एक तर हे तंत्रज्ञान नेमके काय आहे, त्यातून आणखी काय नवे घडू शकते, याचा आपल्या जीवनाशी कशा प्रकारे संबंध येतो याविषयी सर्वसामान्य लोकांच्या मनात असंख्य गोंधळ असतात.
या पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीत अलीकडेच भारत सरकारने ‘एआय’विषयीची जागतिक पातळीवरची एक परिषद भरवली. यात ओपन एआय, ॲन्थ्रॉपिक अशांसारख्या कंपन्यांच्या प्रमुखांसह ‘एआय’मधील काही दिग्गज लोकांनी हजेरी लावली. असल्यामुळे तिला खूप महत्त्व देण्यात आले. यातून नेमके काय साध्य झाले, काय बिघडले याविषयी बरीच चर्चा झाली. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने या परिषदेकडे; तसेच या क्षेत्राकडे नेमके कसे बघायला हवे, हा आपला मुख्य विषय आहे.