

Family Financial Planning
esakal
के. संकर
कुटुंबाचे आर्थिक आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने कोणती आवश्यक पावले उचलली पाहिजेत, या विषयावर ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार के. संकर यांची खास ‘सकाळ मनी’साठी ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. संकर यांनी ‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट नॅटवेस्ट मार्केट’ आणि ‘एडलवाइज’ यांसारख्या अग्रगण्य संस्थांमध्ये काम केले आहे. ते सर्वसामान्य गुंतवणूकदारांना बाजारातील गुंतागुंतीच्या घडामोडी अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगतात.
संकर : सर्वत्र आढळणारी चूक म्हणजे महागाईचा जीवनशैलीवर होणाऱ्या परिणामांचा विचार न करणे. भविष्यातील खर्चाचा अनेकांना अंदाज नसतो आणि असला तरी शास्त्रीय पद्धतीने हा अंदाज निर्धारित केलेला नसतो. अनेकजण जो अंदाज गृहीत धरतात, त्यापेक्षा खूप जास्त खर्च करतात. याचा परिणाम त्यांच्या सेवानिवृत्तीपश्चातच्या जीवनशैलीवर होतो. असे गृहीत धरा, की एका सर्वसामान्य कुटुंबाचा मासिक घरगुती खर्च ६० हजार रुपये आहे; मात्र, त्यांच्या हिशेबात शनिवार-रविवारी बाहेर जेवणे, वेगवेगळी जिमसारख्या वर्गणी, वेगवेगळ्या एएमसी, आरोग्यविषयक खर्च, वार्षिक सहली आदींचा समावेश नसतो. हे सर्व खर्च जमेस धरता हा आकडा अनेकदा ९० हजार ते एक लाख रुपयांचा टप्पा सहज पार झालेला असतो. दरमहा ३० ते ४० हजार रुपयांची तफावत वार्षिक चार लाखांपेक्षा जास्त होते. अशा अशास्त्रीय हिशोबामुळे केवळ त्यांची सेवानिवृत्तीची बचत कमी पडते असे नाही, तर त्यांची काही आर्थिक उद्दिष्टेही अपूर्ण राहतात, ज्यामुळे पुढील आयुष्य सुखाचे जात नाही. अनावश्यक आणि सहज मिळते म्हणून अधिक व्याजदराने कर्ज घेणे ही आणखी एक सर्वसामान्य चूक आहे. सर्वच कर्जे मुळात वाईट नसतात; पण कर्जाचा प्रकार महत्त्वाचा असतो. महागाईच्या दराच्या दुप्पटीपेक्षा जास्त व्याजदर असलेले कोणतेही कर्ज घेणे हा एक चुकीचा पर्याय आहे; तसेच ३६ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदराचे क्रेडिट कार्ड कर्ज म्हणजे एक आर्थिक घोडचूक आहे. गृह आणि शिक्षण कर्ज कमी व्याजदर, कर लाभ आणि परतफेडीसाठी दीर्घावधी यामुळे जीवनशैली सुधारते. परदेशातील सुट्टी किंवा चैनीची वस्तू खरेदी अशा ऐच्छिक खर्चासाठी घेतलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजाचा खर्च विचारात घेतल्यास, ते कालांतराने अनेकदा जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अनावश्यक कर्ज घेणे एक मोठी चूक असते. जोखीम कमी करणे हा वैयक्तिक नियोजनातील आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. आपत्कालीन निधी, वैद्यकीय विमा आणि मुदत विमा (टर्म प्लान) हे संरक्षणाचे तीन आधारस्तंभ आहेत. कोविड महासाथीच्या काळात, ज्या कुटुंबांचे हे तिन्ही आधारस्तंभ भक्कम होते, ती कुटुंबे आर्थिकदृष्ट्या तगून राहू शकली. ज्यांच्याकडे पुरेसा आरोग्य विमा किंवा बचत नव्हती, त्यांना त्यांची गुंतवणूक तोट्यात विकण्यास भाग पडले, ज्यामुळे त्यांची दीर्घकालीन उद्दिष्टे धोक्यात आली.