

Mutual Fund Investment
esakal
कृष्ण जोशी- joshikri@gmail.com
शेअर बाजार यापुढील काही महिने तरी सध्याच्याच टप्प्यात फिरत राहील, असे भाकीत आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीचे (म्युच्युअल फंड) एमडी व सीईओ ए. बालसुब्रमणियन यांनी मागील वर्षी केला होता. मात्र, आता काही महिन्यांतच शेअर बाजार वाढ दाखवू शकेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या वाढीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी, बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड, फ्लेक्सिकॅप फंड, मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड यावर भर द्यावा, असा त्यांचा सल्ला आहे. आयटी क्षेत्रदेखील काही काळाने चांगली मूल्यवाढ देईल, असेही त्यांचे म्हणणे आहे. या मुद्द्यांवर त्यांनी ‘सकाळ मनी’शी केलेली बातचित.
प्रश्न : मागच्या वर्षीच्या ‘सकाळ मनी’शी बोलताना तुम्ही शेअर बाजाराचा हा टप्पा गुंतवणूकदारांना थकवणारा, रडवणारा असेल, असे सांगितले होते. हा टप्पा आता संपला आहे का?
बालसुब्रमणियन : एकूण देशांतर्गत उत्पादनाची (जीडीपी) वाढ साडेसात टक्के दराने होणार असल्याने त्याचा फायदा शेअर बाजाराला होईल. कंपन्यांची कामगिरीही अत्यंत चांगली होत असून, सरकारने दिलेल्या जीएसटी सवलती; तसेच अर्थसंकल्पातील सवलती यामुळे आपण आता वाढीच्या पुढच्या टप्प्यात नक्की प्रवेश करू. त्यातही शेअर बाजार गेला वर्षभर विशिष्ट टप्प्यातच फिरत असल्यामुळे आता तो रास्त भावपातळीवर आला आहे. बँकांचे व्याजदरही कमी होत असल्याने गुंतवणूक वाढते आहे. पायाभूत सुविधा, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, ऊर्जानिर्मिती या क्षेत्रात गुंतवणूक जास्त करून वाढते आहे. त्यातच आता अमेरिकी आयातशुल्काची टांगती तलवारही संपत चालली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारदेखील वाढीच्या पुढच्या टप्प्यासाठी सज्ज झाला आहे.