

Monsoon And Indian Economy
esakal
डॉ. वीरेंद्र ताटके - tatakevv@yahoo.com
अर्थव्यवस्था ही एकमेकांशी जोडलेल्या अनेक गोष्टींची साखळी असते. एका ठिकाणी बदल झाला, की त्याचा परिणाम इतर अनेक क्षेत्रांवर होतो. भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर मॉन्सूनवर अवलंबून असल्याने पावसातील बदलांचा परिणाम शेती, महागाई, ग्राहकांची खरेदीक्षमता आणि शेअर बाजारावरही होतो. पाऊस, अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक यांचा परस्परसंबंध समजावून सांगणारा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील हा संवाद.
अनिकेत : गुड मॉर्निंग सर!
शिक्षक : गुड मॉर्निंग अनिकेत! अरे, एवढ्या उन्हात इकडे कसा काय आलास आज?
अनिकेत : इकडे जवळच एक काम होते ऑफिसचे. तिथे आलो होतो. म्हटलं, जाताना तुम्हाला भेटून जावं. तुम्हाला वेळ असेल, तर थोडं बोलायचंही होतं.
शिक्षक : अरे, आज मी निवांत आहे. सांग, मला कोणत्या विषयावर बोलायचे आहे आज?
अनिकेत : सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आता नियमितपणे वर्तमानपत्राचे वाचन करतो आहे. त्यात परवा मी एक बातमी वाचली, की या वर्षी मोसमी पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडा कमी होण्याची शक्यता आहे.
शिक्षक : बरोबर वाचलीस बातमी तू! अनेक तज्ज्ञांच्या मते, या वर्षी पाऊस तुलनेनं कमी होण्याची शक्यता आहे. अर्थात, हा फक्त अंदाज आहे.
अनिकेत : हो सर! पण त्या बातमीत पुढे म्हटलं होतं, की अंदाजाप्रमाणे खरंच पाऊस कमी झाला, तर त्याचा नकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर भारतीय शेअर बाजारावर होऊ शकतो. सर, मला कळत नाही, की अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि पाऊस यांचा काय संबंध?
शिक्षक : अरे, पावसाचा संबंध देशाची अर्थव्यवस्था, बँकिंग क्षेत्र, शेअर बाजार या सगळ्यांशीच आहे.