
Train Insurance Cover: 35 पैशांमध्ये 10 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण, रेल्वे तिकीट बुक करताना 'हे' विसरु नका
Train Ticket Insurance Cover: बालासोर, ओडिशा येथील रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. यामध्ये आतापर्यंत सुमारे 280 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 900 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
तुम्हाला माहित आहे का की रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करताना भारतीय रेल्वे महामंडळ (IRCTC) प्रवाशांना विमा देखील देते. या अंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण देण्याची तरतूद आहे.
तिकीट बुक करताना पर्याय उपलब्ध:
जेव्हा देशात लांब पल्ल्याच्या प्रवासाचा विचार केला जातो तेव्हा लोक सामान्यतः रेल्वेचा प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करण्याचेही अनेक फायदे आहेत.
डिजिटायझेशनच्या युगात तिकीट काउंटरवर वेळ न घालवता घरबसल्या ऑनलाइन तिकीट बुक करता येते. यामध्ये तुमची सीट निवडण्यापासून ते प्रवासादरम्यान तुम्हाला खाण्यापिण्याचा पर्याय दिला जातो.
त्याच वेळी, तिकीट बुक करताना, तुम्हाला विमा घेण्याचा पर्याय देखील दिला जातो, ज्याद्वारे प्रवासादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत झालेल्या नुकसानीसह जीवित आणि मालमत्तेचे नुकसान देखील यामध्ये कव्हर केले जाते.
सर्वात स्वस्त विमा संरक्षण:
IRCTC केवळ 35 पैशांमध्ये जवळपास शून्य प्रीमियमवर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते. हा पर्याय ऐच्छिक असला तरी प्रवाशांसाठी हा सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम विमा संरक्षण आहे.
जेव्हा तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट IRCTC वेबसाइटवरून बुक करता तेव्हा तुम्हाला पेमेंट प्रक्रियेदरम्यान प्रवास विम्याचा पर्याय मिळतो.
तुम्ही तो निवडल्यास, तुम्हाला हे विमा संरक्षण 35 पैशांमध्ये मिळते. विशेष म्हणजे हे सर्व प्रवाशांना लागू होते ज्यांचे एका PNR द्वारे बुक केले जाते त्या सर्वांना हो विमा लागु होतो .
'या' परिस्थितीत विमा संरक्षण उपलब्ध:
भारतीय रेल्वे आणि पर्यटन महामंडळाच्या वेबसाइटनुसार, केवळ 35 पैसे खर्च करून हा विमा घेता येईल.
या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या विमा संरक्षणामध्ये कायमचे आंशिक अपंगत्व, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, दुखापत किंवा गंभीर दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहतूक खर्च आणि प्रवासादरम्यान मृत्यू यांचा समावेश होतो.
दुखापतीसाठी 2 लाख; मृत्यूसाठी 10 लाख:
आयआरसीटीसीने दिलेल्या या विमा संरक्षणासंदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवासादरम्यान अपघात झाल्यास आणि प्रवासी जखमी झाल्यास, दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल झाल्यास, त्याला 2 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाईल.
याशिवाय कायमस्वरूपी आंशिक अपंगत्वासाठी 7.5 लाख रुपयांचे संरक्षण देण्याची तरतूद आहे. अपघातात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पार्थिवाच्या वाहतुकीसाठी 10,000 रुपये आणि मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते.