गुंतवणुकीचा दासबोध

आधुनिक जगात कसे वागावे आणि आपली प्रगती कशी साधावी याचा वस्तुपाठ म्हणजे समर्थ रामदास स्वामी लिखित श्रीमत दासबोध हा महान ग्रंथ! सुमारे चारशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ग्रंथातील उपदेश आजही तंतोतंत लागू पडतो.
investment finance planning education money management
investment finance planning education money managementSakal

- स्वाती ताटके

आधुनिक जगात कसे वागावे आणि आपली प्रगती कशी साधावी याचा वस्तुपाठ म्हणजे समर्थ रामदास स्वामी लिखित श्रीमत दासबोध हा महान ग्रंथ! सुमारे चारशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ग्रंथातील उपदेश आजही तंतोतंत लागू पडतो.

गुंतवणूक म्हणजे केवळ पैशाची गुंतवणूक असा गैरसमज सर्वदूर आढळतो. परंतु, दासबोधात सांगितलेली गुंतवणूक आपली सर्वांगीण प्रगती साध्य करते. समर्थ रामदास स्वामींची पुण्यतिथी म्हणजेच ‘दासनवमी’ उद्या सर्वत्र साजरी होत आहे. त्यानिमित्ताने दासबोधातील गुंतवणूक आपल्याला कशी मार्गदर्शक ठरू शकते, हे जाणून घेऊ या.

श्रवणातील गुंतवणूक

समर्थांनी दासबोधात सर्वांत अधिक महत्त्व श्रवणाला म्हणजे लक्षपूर्वक ऐकण्याला दिले आहे. योग्य श्रवणासाठी गुंतवलेला वेळ आपल्याला हमखास परतावा मिळवून देतो. अर्थात, श्रवण केल्यानंतर आपल्या बुद्धीचा कस लावून योग्य-अयोग्य गोष्टी शोधून पाहाव्यात हे सांगताना ते म्हणतात, उदंडाचें उदंड ऐकावें । परी तें प्रत्ययें पाहावे । खरेंखोटें निवडावें । अंतर्यामीं ॥

प्रपंचातील गुंतवणूक

प्रगती साधण्यासाठी आपले कुटुंब नेटके असावे, हे सांगताना समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका! कौटुंबिक पातळीवर योग्य नियोजन केले आणि प्रपंचासाठी योग्य गुंतवणूक केली, तर त्याचा फायदा नक्की होतो. या उलट प्रपंच नेटका न केल्यास सर्वांचीच दुर्दशा होते आणि आपली अवस्था लेंकुरें उदंड जालीं, तों ते लक्ष्मी निघोन गेली, अशी होते असे समर्थ सांगतात.

सुवर्णातील गुंतवणूक

‘प्रपंची पाहिजे सुवर्ण’ हे सांगून समर्थ त्या काळातील सोन्याचे महत्त्व सांगतात. आपल्या खर्चांवर नियंत्रण राहिले नाही, तर नाईलाजाने आपल्याला कर्ज काढावे लागते आणि कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही तर त्या व्यक्तीच्या अवस्थेचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, मागें रुण ज्याचें घेतलें । त्याचें परतोन नाहीं दिल्हें । ऐसें आभाळ कोंसळलें । उद्वेगाचें॥

आरोग्यातील गुंतवणूक

समर्थ म्हणतात, ‘बहुत चिंता करू नये, बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये.’ अशा चुकीच्या सवयींचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर दिसतात आणि आरोग्यात झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. म्हणूनच काही कारणाने आपल्याला एखादा आजार झाला, तर त्यावर लगेच इलाज करावा. आजार असूनही औषध न घेणाऱ्या आणि पथ्य न पाळणाऱ्या व्यक्तीला ते ‘मूर्ख’ म्हणतात.

नोकरी-व्यवसाय

ज्या नोकरी किंवा व्यवसायात असतो, त्यासाठी योग्य वेळेची आणि ज्ञानाची गुंतवणूक करावी, असे समर्थ सांगतात. ज्या ज्याचा जो व्यापार । तेथें असावे खबर्दार । दुश्चितपणें तरी पोर । वेढा लावी असे सांगून समर्थ म्हणतात, की आपल्या नोकरी-व्यवसायात आपण खबरदार नाही राहिलो, तर अगदी छोटे मूलदेखील आपल्याला फसवू शकते.

याशिवाय उत्तम लोकसंग्रह, उद्धमशीलतेतील गुंतवणूक, आळस झटकण्यातील गुंतवणूक अशा विविध विषयांवर दासबोधात सविस्तर मार्गदर्शन केले आहे. दासबोधात सांगितलेली गुंतवणूक आपण काळजीपूर्वक केली, तर समर्थांचे ‘उत्कट भव्य तेंचि घ्यावे । मळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणे विख्यात व्हावें । भूमंडळीं’ हे स्वप्न सहजसाध्य होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com