

Is the Stock Market Finally Attractive? A Deep Dive into Current Valuations
sakal
पद्मनाभ वैद्य, शेअर बाजार अभ्यासक
कोविड महासाथीनंतर पुढील चार वर्षे भारतीय शेअर बाजारात भरपूर तेजी होती. तेव्हा ८,००० अंशांवर असणारा ‘निफ्टी’ २०२४ पर्यंत २६,००० अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण होते. परंतु, २०२४च्या उत्तरार्धात बाजाराचे मूल्यांकन महाग झाल्याने सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२५ या काळात जवळपास १५ टक्क्यांची घसरण बाजारात आली. वर्ष २०२५ मध्ये अमेरिकेने लादलेले आयातशुल्क, भारत-पाकिस्तान संघर्ष, मंदावलेला नफ्याचा दर व कृत्रिम बुद्धीमतेच्या क्षेत्रातील व्यवसायाची कमी या कारणांमुळे शेअर बाजार मंदावला होता.
आता अमेरिका-इराण युद्ध, त्यामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट यामुळे बाजारात नकारात्मकतेचे वातावरण आहे. गेल्या दोन वर्षांच्या खडतर काळानंतर आता भारतीय बाजार दीर्घावधीसाठी (५ वर्षांहून अधिक काळ) गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी बाजार आकर्षक आहे, असे वाटते. जगात भीती, अनिश्चितता आणि भू-राजकीय गोंधळ सुरू असताना भारतीय बाजार सकारात्मक असण्याची कारणे अशी आहेत.
१ स्वस्त मूल्यांकन : शेअर बाजाराच्या २०२४ च्या अतिमहाग मूल्यांकनाच्या (निफ्टी ५०० पीई २८) तुलनेत आज बाजार अधिक आकर्षक स्तरावर (निफ्टी ५०० पीई २२) आहे. एक नामांकित म्युच्युअल फंड कंपनी त्यांच्या दर महिन्याच्या फॅक्ट्शीटमध्ये बाजाराच्या मूल्यांकनावर आधारित एक गुणांक प्रकाशित करते. हा गुणांक २०२४ मध्ये १२५ म्हणजे अतिमहाग स्तरावर पोहोचला होता. आज तो १००च्या स्तराजवळ आहे. वर्ष २०२० नंतर सुरू झालेल्या तेजीनंतर हा गुणांक पहिल्यांदा बाजार आकर्षक असल्याचे दर्शवत आहे.