Seema Deo : आदर्श दांपत्याचा लग्नापूर्वीचा अबोला!

दोघांमधील या अबोल्याचे कारण तसे अगदी क्षुल्लक होते. दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होते; पण ते वयच असे होते की इथे छोट्या- छोट्या कारणावरून असुरक्षित वाटायचे.
actress seema deo and ramesh deo love marriage incident
actress seema deo and ramesh deo love marriage incidentSakal

साठच्या दशकात जेव्हा मराठी चित्रपट सृष्टीत तमाशापटांची चलती होती या काळात अभिनेत्री सीमा देव यांच्या सोज्ज्वळ भूमिकांनी रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. अभिनेता रमेश देव यांच्याशी त्यांचे १९६३ मध्ये लग्न झाले.

हा प्रेमविवाह होता. पण लग्नापूर्वी एक वर्ष त्यांचा अबोला होता. राजा परांजपे दिग्दर्शित सुवासिनी (१९६१) या चित्रपटाच्या वेळी रमेश व सीमा यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला निर्माण होता. दोघे एकमेकांशी एक शब्दही बोलत नव्हते. पण दोघांमध्येही व्यावसायिकपणा असल्यामुळे चित्रपटातील भूमिका त्यांनी अतिशय मन लावून केल्या.

दोघांमधील या अबोल्याचे कारण तसे अगदी क्षुल्लक होते. दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होते; पण ते वयच असे होते की इथे छोट्या- छोट्या कारणावरून असुरक्षित वाटायचे. ‘सुवासिनी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सीमा (त्या वेळच्या नलिनी सराफ) कोल्हापूरला गेल्या असताना अंबाबाईच्या मंदिराजवळ त्यांना रमेश देव एका मुलीसोबत दिसले.

मनात अर्थातच चलबिचल झाले आणि प्रचंड राग देखील आला होता. वस्तुतः ती मुलगी रमेश देव यांची पुतणी होती. रमेश देव यांनी त्यांना समजावून सांगितले; पण शब्दाने शब्द वाढत गेला आणि अबोला सुरु झाला.

सीमा व रमेश देव यांचा ‘एक धागा सुखाचा’ (१९६२) हा दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपट आला होता. तो देखील असाच ‘अबोल्या’त गेला. त्यानंतरचा चित्रपट होता दिनकर द पाटील यांचा ‘वरदक्षिणा’. या चित्रपटाच्या वेळी मात्र त्यांच्यातील मतभेद मिटले. त्याला देखील एक छान कारण मिळाले.

या चित्रपटात रमेश देव यांना एक गाणे होते ‘एक वार पंखावरूनी फिरो तुझा, हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात...’ या गाण्याच्या चित्रीकरणानंतर रमेश देव यांनी या गाण्याच्या ओळी एका कागदावर लिहून ‘आता भांडण पुरे’ असे म्हणून तो कागद सीमाकडे सरकवला.

दोघांचे एकमेकांवर अतूट प्रेम होतेच आणि भांडण प्रेमाचेच होते. त्यामुळे प्रियकराच्या डोळ्यातील सच्च्या प्रेमाच्या भावनेने प्रेयसीच्या मनातील मतभेद क्षणार्धात वाहून गेले आणि १ जुलै १९६३ मध्ये नलिनी सराफ ही सीमा देव झाली. त्यानंतर रमेश देव- सीमा देव चित्रपटसृष्टीतील सर्वात आदर्श दांपत्य ठरले.

- धनंजय कुलकर्णी (लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com