पहिली गरज (पहाटपावलं)

ananda-anterkar
ananda-anterkar

गेल्या सोमवारी डोळ्यांच्या डॉक्‍टरांकडे गेलो होतो. तिथं बऱ्याच दिवसांनी जयंत खुरटे भेटला. तो खाणावळ चालवतो. नंबर यायला वेळ होता म्हणून गप्पा सुरू झाल्या. ""कसं काय चाललंय? मासिकं जोरात आहेत ना?'' खुरटेनं चौकशी केली. ""हो, चांगलं चाललंय. पण आता थांबावं म्हणतोय. खूप केलं. सत्तावन्न वर्षं तीन तीन मासिकांचा गाडा ओढला. आता होत नाही.'' मी सांगितलं. ""अरे! मग करणार काय नंतर?'' खुरटेला माझी काळजी वाटली असावी. 
""काही नाही. या साऱ्या पसाऱ्यात स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. आवडीच्या गोष्टी करता आल्या नाहीत. त्यासाठी आता वेळ देणार. आयुष्य किती राहिलंय, माहीत नाही.'' 
""पण खरं सांगू? आता सगळं पोकळ आणि निष्फळ वाटू लागलंय. निराशा बिलकुल नाही. पण अखेर काय, आपण आहोत तोवर सारं असतं. तुमच्या मागे विचारतो कोण तुम्हाला? एका विशिष्ट डेड एंडपर्यंत पोचणं एवढंच तुमचं प्राप्तव्य असतं.'' 
""पण तू रिटायर झालास तर मग उत्पन्नाचं काय? तुझं भागणार कसं? आपल्या लोकांना पेन्शन वगैरे काही नसतं.'' 
""त्यांची चिंता नाही. थोडीफार माया आहे जवळ. आणि खर्च कमी करणार. गरजांना कात्री लावणार. आता मिळवायचं कशासाठी आणि कुणासाठी? शिवाय विश्रांतीचं स्थानही महत्त्वाचं आहेच ना?'' 
""म्हणजे तू आता काम करणार नाहीस? मग वेळ कसा जाणार तुझा? वाईट वाटतं रे. खूप मोठं नुकसान होणार ते साहित्याचं. तुम्ही मंडळींनी खूप केलं आहे मराठीसाठी.'' 
""वेळ जावा म्हणून आयुष्यात मी काहीच केलं नाही. केलं ते फार निष्ठेनं आणि तळमळीनं. आणि कधी तरी प्रत्येकालाच थांबावं लागतं ना! आणि साहित्याचं नुकसान वगैरे म्हणशील तर सगळा बकवास आहे. काही नडत नाही कोणाचं कोणावाचून. आमची बाउंड्री ती केवढी आणि तू असा काय मोजतोस. उगीच भावनवश होऊ नकोस. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. आता आयुष्याकडून काहीच मागणं नाही. अगदी तृप्त आहे मी.'' 
""बरं आहे तुमचं. नाहीतर आम्ही! अजूनही बसलोय लोकांचे डबे करत! पहाटे चारपासून राबता सुरू. रोज उठून भाज्या, आमट्या, चटण्या न्‌ किशिंबिऱ्या! कसलं लाइफ रे हे! आम्ही वाढता वाढताच संपणार.'' 
""बरं आहे की! आमच्यापेक्षा तुमचा धंदा खरा समजोपयोगी. आमच्या साहित्यावाचून कुणाचं काही नडत नाही. साहित्य वाचून ज्ञान मिळत असलं, तरी ते वाचून कुणाचं पोट भरत नाही. साहित्याचं वाचन ही माणसाची अगदी शेवटच्या क्रमांकाची गरज असते. देवादिकांसाठी खास अन्न (ambrosia), सुरा, अमृत आदी पदार्थ स्वर्गात रांधले जातात. ""देवान्न'' म्हणतात त्याला. पण देवासाठी स्वर्गात कुणी ग्रंथ लिहिल्याचं किंवा साहित्य छापल्याचं तुझ्या ऐकिवात आहे काय? - नाही ना? मग त्याचा अर्थ काय समजायचा? आणि मराठी भाषेचं म्हणशील, तर तिला सध्या असाध्य असा चिकुनगुनिया झालाय. तिचे सगळे सांधे भयंकर ठणकताहेत. तिचा आजार आता उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही. 
""देवांचं तसं सगळं छान चाललेलं असतं रे. तेहतीस कोटी त्यांची संख्या. प्रत्येकाच्या आवडीचा वेगवेगळा नैवेद्य. कुणाला खिरीचा, कुणाला मोदकाचा, कुणाला दिंडीचा, कुणाला बकऱ्याचा, अँड सो ऑन. पुस्तकांचा नैवेद्य कुणाला दाखवणार तू? आणि समजा दाखवलास, तरी ती वाचायला त्यांना वेळ हवा ना?... 
""तेव्हा तू उगाच विव्हल होऊ नकोस. तुझाच धंदा श्रेष्ठ. आपल्या पोटात देवानं पॅंक्रिया दिलाय तो अन्न पचविण्यासाठी. पुस्तकं पचविण्यासाठी नव्हे! पुस्तकामुळे, साहित्याच्या वाचनामुळे माणूस विद्वान होतो, बुद्धिवंत होतो, साक्षर आणि जीवनसमृद्ध होतो, वगैरे म्हणायला ठीक आहे. पण हे सगळं केव्हा? तुम्ही त्यासाठी जीवंत राहिलात तर ना!... एवढी मोठी आहे तुझ्या कार्याची किंमत. तीच परिस्थिती इथं पृथ्वीतलावर. मग देवाचं खर की आमचं खरं? देवांनासुद्धा नाही वाटली ना गरज वाचनाची? झालं तर! तुझंच कार्य थोर!'' 
तेवढ्यात माझा नंबर आला. डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. उद्यापासून नव्या पुस्तकाची मुद्रितं चावायला - चुकलं, वाचायला घ्यायची आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com