नात्यामध्ये "स्पेस' हवी

couple-space
couple-space

लग्न ठरताच माझ्या भाचीनं उत्साहानं जाहीर केलं, ""आमच्या बऱ्याचशा आवडीनिवडी जुळतात, म्हणून लग्न झाल्यावर आम्ही सर्वकाही एकमेकांबरोबरच करू. ऑफिस सुटलं की पुढचा पूर्ण वेळ सोबतच घालवायचा असं मी त्याला आधीच सांगून ठेवलंय.'' तिच्या चेहऱ्यावर आनंद नि उत्साह ओसंडत होता. माझ्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली. तिच्या उत्साहावर पाणी टाकावं की नंतर कधीतरी तिच्याशी या विचारावर बोलावं, असा विचार मनात असताना ती शॉपिंगसाठी निघून गेली.

हे असं नेहमीच होतं. नवीन जोडप्याला एकमेकांची इतकी ओढ असते, की ते शक्‍य तितका वेळ एकमेकांसोबत घालवण्यासाठी उत्सुक असतात. तुम्हाला वाटेल यापेक्षा चांगलं आणखी काय हवं? आज तुम्हाला विचार करायला एक नवीन दृष्टिकोन देऊ इच्छिते. पटतंय का बघा.

दोन व्यक्ती एकमेकांच्या कितीही प्रेमात असल्या, तरी त्या दोन्ही भिन्न व्यक्तिमत्त्वाच्या स्वामी असतात. काही गोष्टी त्यांच्यात सारख्या असू शकतात. परंतु, मुळात ते एक नसून दोन भिन्न व्यक्ती आहेत, हे विसरून चालणार नाही. अगदी दोन सख्खी किंवा जुळी भावंडंसुद्धा वेगळी असतात. भौतिकरीत्या, मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकरीत्या त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. मग या तर दोन विरुद्ध लिंगांच्या, वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या वेगळ्या व्यक्ती आहेत. तेव्हा सतत सर्व काही मिळून आणि सारखं करायचं हे दोघांना नेहमीच आवडेल, ही कल्पना नैसार्गिक वाटते काय?
बरं प्रेमात आहेत म्हणून काही काळ तसं बरंही वाटत असेल, परंतु स्त्रीला आणि पुरुषाला आपलं स्त्रीत्व आणि पौरुष जोपासण्यासाठी अन्य व्यक्तींबरोबर वेळ घालवणं आणि विचारांचं व भावनांचं आदानप्रदान करणं आवश्‍यक असतं. आपल्या समाजात लग्न झाल्यावर पत्नीने मैत्रिणींबरोबर वेळ घालवणं पतीला आवडत नाही, तर एकटी असते म्हणून पत्नीलाही पतीनं आपल्या मित्रांसोबत वेळ घालवणं आवडत नाही. त्यामुळे दोघांचाही कोंडमारा होतो. दोघांचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी स्त्री इतर स्त्रियांच्या सहवासात जितकी खुलते, हसते आणि मनमोकळं बोलते, तितकी ती कुठेच मोकळी नसते आणि पुरुषांनाही पुरुष मित्रांमध्ये मोकळं व्हायला आवडतं.

जी जोडपी एकमेकांना वेळ देत नाहीत, त्यांच्या नात्यातला प्रॉब्लेम सर्वांनाच दिसतो. परंतु बरीच जोडपी जी काही कारणांमुळं आपलं अस्तित्व विसरून केवळ आपल्या भागीदारासोबतच सर्व वेळ घालवतात, त्यांना एकमेकांमध्ये रस राहत नाही. जीवन रटाळ आणि रसहीन जाणवतं.

प्रत्येकाचं आपलं असं व्यक्तिमत्त्व असतं. त्या व्यक्तिमत्त्वाला जोपासायला पुरेशी मोकळी जागा मिळाली तर ती व्यक्ती आणि तिचं नातं दोन्ही खुलतात आणि प्रेम व आकर्षण दीर्घकाळ टिकून राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com