
विमानात भरलेल्या सव्वा लाख लिटर इंधनाच्या ज्वालाग्राही गोळ्याने आप्तस्वकीयांच्या भेटीसाठी आतुर झालेल्यांना क्षणार्धात गिळंकृत करून टाकले. मरण-कल्पनेशी जाणत्यांचाही तर्क थांबतो. हे दु:ख गिळूनच पुढले आकाश पाहावे लागेल.
अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या विमान दुर्घटनेने असंख्य शोकांतिकांना जन्म दिला. तसे पाहता दुर्घटनांची आपल्या देशात कमतरता नाही. रेल्वे अपघात, दरडी कोसळणे, पुलांच्या डोलाऱ्यांचे कोसळणे, चेंगराचेंगरी, दंगल, चक्रीवादळे, महापूर अशा असंख्य नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांनी हजारो माणसे मृत्युमुखी पडत असतात.