

High Voter Turnout in Bihar Phase One
Sakal
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत मतदारांचा मिळालेला भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसाद नोंद घ्यावी असा आहे. त्याचा लाभ कुठल्या आघाडीला याची गणिते मांडणे लगेचच सुरू झाले असले तरी या सहभागाचा आणखी एक अर्थ लोकांच्या वाढलेल्या विकासविषयक आकांक्षांशी निगडित आहे. राजकीयदृष्ट्या हे राज्य नेहेमीच महत्त्वाचे राहिले आहे. सत्तरच्या दशकात देशात ज्या राजकीय उलथापालथी झाल्या, त्याचा प्रारंभ याच राज्यातून झाला होता. भ्रष्टाचाराच्या विरोधातील चळवळीची सुरवातही बिहारमधून झाली होती. त्यामुळे या निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागून राहिले असल्यास नवल नाही. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील विधानसभेच्या १२१ जागांसाठी ६५ टक्के मतदान झाले. हे प्रमाण उच्चांकी आहे. हिवाळ्याच्या आगमनामुळे झालेले आल्हाददायक वातावरण, राज्यातील एक कोटी ४० लाख महिला मतदारांना नितीशकुमार सरकारने केलेली दहा हजार रुपयांची आर्थिक मदत, बेरोजगार तरुणांची वाढलेली मतदानातील सक्रियता अशा विविध कारणे त्यामागे आहेत.