भारत-ब्रिटन व्यापारकरार ऐतिहासिक आहे. वस्तूंचा दर्जा सांभाळणारी गुणवत्ता आणि दरांतील स्पर्धात्मकता आपण कशी राखतो, यावर या कराराचे यश अवलंबून असेल, याचे भान मात्र ठेवावे लागेल.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या द्विपक्षीय व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या, ही ऐतिहासिक घटना आहे, यात शंका नाही. दोन्ही देशांनी परस्परांची उत्पादने व सेवा यांच्यासाठीच्या आयातशुल्काचे दर लक्षणीय प्रमाणात खाली आणले असून यातून व्यापाराला आणि त्या अनुषंगाने दोन्ही देशांच्या आर्थिक विकासाला पाठबळ मिळू शकेल.