
आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्वांत महत्त्वाचे ठरतात, ते हितसंबंध, या उक्तीचा प्रत्यय सध्या प्रकर्षाने येत आहे. अमेरिकेने ‘आयातशुल्कास्त्रे’ सोडून भारत, चीन व इतरही देशांच्या बाबतीत जे धोरण स्वीकारले आहे, त्यामुळे या देशांनी आपसांतील सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतल्यास ते स्वाभाविकच. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोेदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील चर्चा या पार्श्वभूमीवर झाल्याने तिला विशेष महत्त्व आहे. खरे तर चीनशी भारताचे संबंध सुधारावेत आणि परस्परसहकार्य वृद्धिंगत व्हावे, यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न झाले आहेत.