

समरांगणावरील व्यूहरचनेचे मेजावरील प्रतिरूप म्हणून बुद्धिबळाचा खेळ जन्माला आला, की बुद्धिबळाच्या चौसष्ट चौकड्यातील रणभूमी प्रत्यक्ष युद्धात रूपांतरित झाली, हा अभ्यासाचा विषय आहे. या खेळाचा जन्म भारतात झाला किंवा नाही, यावरही नेहमीच वाद होतात; परंतु प्राचीन काळापासून बुद्धिबळाचा पट भारतीय खेळांच्या विश्वात आपले अस्तित्व राखून आहे हे मात्र खरे. त्या खेळाला देशात क्रिकेटादी खेळांप्रमाणे सर्वदूर वलय लाभले नसले तरी देशातील बुद्धिबळपटूंच्या पराक्रमामुळे वाढत्या संख्येने लोक त्या खेळाकडे आकृष्ट होत आहेत, हे नक्की.