
भारतीय अर्थव्यवस्थेने पाच ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य गाठण्यापूर्वीच भारतीय शेअर बाजाराच्या बाजारमूल्याने पाच ट्रिलियन डॉलरचे ‘माऊंट एव्हरेस्ट’ पादाक्रांत करण्याचा पराक्रम केला. पण ऑक्टोबर ते फेब्रुवारीअखेर या गुंतवणुकीचा कडेलोट होऊन शेअर बाजाराने ८५ लाख कोटींचे बाजारमूल्य गमावले आहे. लाखोंच्या संख्येने ‘एसआयपी’चा मध्यममार्ग पत्करणारे अनेक मध्यमवर्गीय गुंतवणूकदार या वित्तस्खलनात सापडले आहेत. भारतीय शेअर बाजाराने यापूर्वी अशी घसरण १९९६ मध्ये जुलै ते नोव्हेंबरदरम्यान अनुभवली होती. तब्बल २९ वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती झाली आहे. जगभरातील शेअरबाजार कोसळण्याच्या घटना अधूनमधून होतच असतात.