
सध्या शिगेला पोहोचलेल्या व्यापारयुद्धाच्या वावटळीत सापडून जगातील अनेक देश सैरभैर झाले असताना भारतातील आर्थिक हवामान बऱ्यापैकी स्थिर राहील, असा अंदाज देशाच्या ‘आर्थिक वेधशाळे’ने म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने वर्तविला आहे. रिझर्व्ह बँकेने केवळ अंदाजच व्यक्त केला नाही, तर संभाव्य स्थिर हवामानाला अनुसरुन पतधोरण समितीच्या सहाही सदस्यांनी एकमताच्या निर्णयाने रेपोदरात पाव टक्क्याने कपातही करुन दाखवली. जागतिक निर्यातीच्या आघाडीवर जे व्हायचे ते होईल, पण १४६ कोटी लोकसंख्या असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याची स्थिती दुरुस्त करण्यासाठी व्याजदरकपातीचे पाऊल महत्त्वाचे ठरेल.