फुटीरतावाद आणि दहशतवादाचा खात्मा करायचा असेल तर जनतेची साथ अत्यंत महत्त्वाची आहे, यावर उमर अब्दुल्ला यांनी दिलेला भर महत्त्वाचा आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा घाव जम्मू-काश्मीर राज्याच्या किती वर्मी बसला आहे, याचे दर्शन जम्मू-काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात घडले. या भागाची सारी अर्थव्यवस्था ज्या पर्यटनावर अवलंबून आहे, त्यावरच या हल्ल्याने मोठा आघात केला असल्याने सर्वच लोकप्रतिनिधींच्या मनावरील ताण या अधिवेशनात जाणवला.