
राजधानी दिल्लीला आजवर तीन महिला मुख्यमंत्री लाभल्या. त्यात मुख्यमंत्रिपदाच्या दीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीचे श्रेय लाभलेल्या शीला दीक्षित या एकमेव. सुषमा स्वराज आणि आतिशी यांच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदाचे शेवटचे काही दिवस आले. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री. रेखा गुप्ता यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी असेल. शीला दीक्षित यांनी पंधरा वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा मजबूत करुन दिल्लीचा कायापालट केला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या केजरीवाल यांनी त्यात कोणतीही भर न घालता आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी मोफत वीज, पाणी, आरोग्य सुविधा आणि सरकारी शाळांच्या कल्याणकारी योजना राबविण्याला प्राधान्य दिले. शीला दीक्षित यांच्या कारकीर्दीनंतर विराम लागलेल्या सर्वसामान्य दिल्लीकरांशी निगडित पायाभूत सुविधांच्या प्रश्न नव्या मुख्यमंत्र्यांना हाताळावा लागेल.