राष्ट्र ही संकल्पना २०० कोटींच्या ‘उम्मा’पेक्षा मोठी आहे याचे भान सुटल्यामुळे मुस्लिम जग शक्तिहीन झाले आहेत. मध्य-पूर्वेतील संघर्ष गाढ झोपेत गेला असल्याचे चित्र निर्माण झाले असताना हमासमुळे मुस्लिम जगातील विरोधाभास आणि अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न पुढे आले आहेत.
इस्राईलच्या सैन्याकडून गाझापट्टीत सध्या जी हिंसात्मक कारवाई करण्यात येत आहे, त्याकडे बघता ती योग्य कारवाईच्या चौकटीत बसते काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या गाझात जी कारवाई सुरू आहे त्याचे स्वरूप अमानुष आणि सार्वजनिक शिक्षा असेच आहे.
मध्य-पूर्वच नव्हे तर त्यापलीकडच्याही जगात शक्तीशाली सैन्यदल म्हणून दबदबा असलेल्या इस्राईलच्या सैन्याकडून बदल्याच्या भावनेतून ही कारवाई होत आहे. हमासने ७ ऑक्टोबरला जे कृत्य केले तो प्रकारही ज्यू धर्मियांच्या विरोधात तिरस्काराच्या भावनेतून करण्यात आलेला मोठ्या प्रमाणावरील हल्लाच होता.
परंतु, इस्राईलकडून प्रत्युत्तरात जी करण्यात येत आहे त्यातून स्वरूप गाझा पट्टीतील मुस्लमांविरुद्ध असलेला द्वेष दिसून येत आहे.
अमेरिका वगळला तर इस्राईलच्या सर्वच मित्रांनी प्रत्युत्तरादाखल सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात नापसंती व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघात युद्धविरामाच्या प्रस्तावावर भारताने तटस्थ भूमिका घेतली. भारत हा इस्राईलचा सध्या अतिशय जवळचा मित्र आहे. मात्र, भारताच्या भूमिकेचा इस्राईलवर काहीही परिणाम झालेला नाही.
आता प्रश्न हा आहे की मुस्लिम जगतातून एकत्रित प्रतिकाराची शक्यता असती तर इस्राईलला अशी कारवाई करता आली असती का? मुस्लिम जग ही जर खरी, राजकीय आणि राष्ट्रविरहित संकल्पना असती तर त्याची एकत्रित शक्ती जगाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांश एवढी असती.
दुसरीकडे ज्यू धर्मीयांची संख्या आहे ती केवळ एक कोटी ६० लाख. ज्यूंची संख्या जगाच्या लोकसंख्येत केवळ ०.२ टक्के एवढी आहे. मुस्लिम गरीब आणि ज्यू श्रीमंत असल्यामुळे या दोहोंच्या सामर्थ्यात तफावत आहे काय? असाही प्रश्न उपस्थित होतो.
जागतिक लोकसंख्येत मुस्लिमांची टक्केवारी २५ टक्के एवढी आहे आणि जगाच्या सकल उत्पादनात २३ टक्के वाटा मुस्लिम राष्ट्रांचा आहे. याउलट ज्यू धर्मीय जगात सर्वत्र विखुरले आहेत. जगातील काही महत्त्वाच्या आर्थिक संस्थांचे प्रमुख ज्यू असले तरीही ते स्वतःला एक राष्ट्र वा एक शक्ती मानत नाहीत.
जगात विखुरलेले ज्यू इस्राईलमधील ज्यूंच्या पाठीशी आहेत. तथापि, यातील अनेकांनी इस्राईलकडून सुरू असलेल्या कारवाईच्या जाहीरपणे विरोध केला आहे. अशाप्रकारच्या विरोधाचे प्रदर्शन मुस्लिमांच्या गटांकडून मात्र दिसले नाही.
इजिप्त, संयुक्त अरब अमिरात आणि अन्य एक-दोन देशांनी हमासच्या विरोधात क्षीण आवाज उठवला एवढेच. जगाची एक चतुर्थांश लोकसंख्या, जगातील बहुतांश खनिज तेलाचे मालक असलेले इस्लामी देश, पाकिस्तानसारखे अण्वस्त्रधारी राष्ट्र यांच्या एकत्रित ताकदीलाही इस्राईलने भीक घातलेली नाही. हे असे असेल तर मग मुस्लिम उम्माची एकत्रित ताकद आहे कुठे?
आपल्या धर्मासाठी राष्ट्राच्या सीमांचा भेद न मानता साऱ्या मुस्लिमांचे जग एकच आहे, अशी मुस्लिम उम्माची व्याख्या केली जाते. त्यामुळे आजच्या परिस्थितीचा विचार करता मुस्लिम जग खरेच अस्तित्वात आहे का? हाही प्रश्न उपस्थित होतो.
केवळ मुस्लिमच नव्हे तर अन्य कुठलाही धर्म राष्ट्रांच्या आणि राष्ट्रवादाच्या सीमा ओलांडू शकतो काय? असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. मुस्लिम उम्माप्रमाणे ख्रिश्चन जग असे काही सध्या अस्तित्वात नाही. जगात लोकसंख्येच्या प्रमाणात हिंदुधर्मीय तिसऱ्या स्थानावर आहे. ते आपसांत भारत हे हिंदू राष्ट्र आहे अथवा नाही यावर चर्चा करू शकतात.
तर ज्यू धर्मीयांचे एक राष्ट्र आहे. राजकीय इस्लाममध्ये धर्मावरील निष्ठेला राष्ट्रीयत्वाच्या वरचा दर्जा देण्याचा विचार आहे. यातूनच मुस्लिम उम्मासारख्या स्वप्नवत संकल्पनेचा विचार मांडला गेला. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनमध्ये ५७ राष्ट्रांचा समावेश आहे. या देशांचा जागतिक जीडीपीत २३ टक्क्यांचा वाटा असला तरीही मुस्लिमांच्या एखाद्या प्रश्नासाठी हे सारे देश एकत्र आले, असे कधीही झाले नाही.
विविध मुस्लिम देशांचा समावेश असलेल्या गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल या संघटनेचा थोडाफार दबदबा आहे. मात्र, ही संघटना पाश्चिमात्य मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारी आहे. यातील दोन महत्त्वाच्या राष्ट्रांनी अब्राहम करारावर स्वाक्षरी केली असून, तिसरे राष्ट्र या करारावर स्वाक्षरी करण्याच्या तयारीत असताना हमासच्या हल्ल्याचा प्रकार पुढे आला.
कतार हा या कौन्सिलचा सदस्य असून तो दोन्ही डगरींवर हात ठेवून आहे. कतारचे इराण आणि अमेरिकेशी चांगला संबंध असून मुस्लिम ब्रदरहूड आणि हमासशीही त्यांचे संबंध आहेत. इस्लामिक जगाच्या मागील पन्नास वर्षांच्या इतिहासावर कटाक्ष टाकला असता यातील बहुतांश देशांना अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागला असे दिसून येते. नाही म्हणायला नफेखोरीसाठी या देशांनी एकत्र येऊन खनिज तेलाच्या किमती जरूर वाढवल्या.
आता या ‘जगातील’ सशस्त्र संघर्षांवर नजर टाकू. गाझा पट्टीत महिला आणि मुलांसह हजारो नागरिकांचा बळी गेला आणि अजूनही जात आहे. अमेरिकेच्या मदतीने सौदीचे सैन्य येमेनच्या हाऊदींच्या विरोधात लढले.
यात साडे तीन लाख जणांचा मृत्यू झाला. सुदानमधील यादवीत गेल्या काही दशकांत पाच लाख नागरिकांचा बळी गेला. सीरियामधील यादवीत चार लाख मुस्लिमांना जीव गमवावा लागला. गेल्या काही दशकांत मुस्लिम जगात मुस्लिमांकडूनच कत्तल झालेल्यांची संख्या १० लाखांपेक्षा अधिक आहे. इराण आणि इराक यांच्यात आठ वर्षे युद्ध चालले.
मुस्लिम जगातील या सुंदोपसुंदीसाठी पाश्चिमात्य राष्ट्रांना जबाबदार ठरविण्याची फॅशन झाली आहे. सद्दाम हुसेनच्या विळख्यातून इराकची मुक्तता करण्यासाठी इस्लामिक राष्ट्रांनी अमेरिकेला गळ घातली होती. आपल्या देशांमधील अनागोंदीमुळेच एकूण २०० कोटी लोकसंख्या असलेल्या मुस्लिमांना एकत्रित अशी शक्ती अद्याप उभारता आलेली नाही.
राष्ट्रीयत्व आणि विचारसरणी या संकल्पना राष्ट्रांच्या सीमेपलिकडील निष्ठांवर भारी पडतात या वास्तवाला नाकारण्याचाही या अपयशात मोठा वाटा आहे. गाझा युद्धात इस्राईलवर दबाव टाकण्यात आलेल्या अपयशाने धर्माधारित एकतेच्या विचाराचा फुगा फोडला आहे. नेतान्याहू व इस्राईलच्या नेत्यांना या अपयशाची चांगलीच कल्पना आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.