पाणी ‘जोखणारे’ व्यावसायिक

पाण्या तुझा रंग कसा? पाण्या तुझा स्वाद कसा? ग.दि.माडगूळकरांनी लिहिलेले हे गीत.
hydrotech laboratory water supply solopreneur enterprise story
hydrotech laboratory water supply solopreneur enterprise storyesakal

- ललितागौरी कुलकर्णी

पाण्या तुझा रंग कसा? पाण्या तुझा स्वाद कसा? ग.दि.माडगूळकरांनी लिहिलेले हे गीत. खरोखरच वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी चवीला वेगवेगळे असते आणि त्याचे गुणधर्मही वेगवेगळे असतात.

काही वर्षांपूर्वी सगळीकडे महानगरपालिकेचे पाणी नळाला मुबलक यायचे. खडकवासल्यामधून येणारे शुद्धिकरण केलेले हे पाणी सर्व निकषांवर उत्तम असते. परंतु शहराच्या अक्राळविक्राळ वाढीमुळे आता सर्वच नवीन भागांमध्ये बोअरचे पाणी किंवा टँकरचे पाणी वापरले जाते. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमधून पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या अभाव ही हळूहळू समस्या बनते आहे.

पाश्चात्य देशांमध्ये प्रत्येक शहराचा पाणी अहवाल नागरिकांसाठी सहजगत्या उपलब्ध असतो. त्यात किती प्रमाणात कोणती रसायने आहेत, ते पाणी पिण्यायोग्य आहे का, किंवा ते पिण्यायोग्य बनविण्यासाठी त्यावर काय प्रक्रिया केल्या आहेत, याचा तपशील त्यात असतो.

आपल्याकडे अद्यापही शहरांमध्येदेखील पिण्याच्या पाण्याबद्दल तितकी सजगता दिसत नाही. सरकारी अहवाल सहजगत्या उपलब्ध नसले तरी पाण्याची तपासणी करण्यासाठी खासगी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. सुहास काणेकर यांची ‘हायड्रोटेक लॅबोरेटरी’ ही त्यापैकीच एक.

पाण्याची शास्त्रशुद्ध तपासणी करून ते पिण्यायोग्य आहे की नाही, याचा अहवाल या प्रयोगशाळेत तयार केला जातो. ‘ॲनालिटिकल केमिस्ट्री’ची पदवी घेतल्यानंतर काही दिवस ‘सिप्ला’मध्ये काम केले.

त्यानंतर स्वतःचा हा व्यवसाय काणेकर यांनी २००५मध्ये सुरु केला. त्यासाठी मुंबईमध्ये खास पाणी तपासणीचे सरकारमान्य प्रशिक्षण घेतले आणि स्वतःची प्रयोगशाळा सुरु केली. त्यावेळी पुण्यात पाणी तपासणीसाठी हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्याच प्रयोगशाळा होत्या.

पुण्याच्या आजूबाजूला आज लोकवस्तीची प्रचंड वाढ झाल्यामुळे महानगरपालिकेचे पाणी सर्वच ठिकाणी पुरवले जाते असे नाही. जवळजवळ सर्वच भागातील नवीन वसाहती बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असतात.

त्यामुळे घरांमध्ये पाणी शुद्ध करणारी उपकरणे वापरावी लागतात. पण उपकरणामधून आलेल्या पाण्याच्या दर्जाची तपासणी करावीच लागते. त्यामुळे या पाण्याची तपासणी करून घेण्यासाठी बरीच मागणी आहे.

तसेच पोहण्याचे तलाव, हॉटेल इत्यादी ठिकाणीदेखील पाण्याची शुद्धता वारंवार तपासून बघावी लागते. कोरोनानंतर एकूण आरोग्याविषयी सजगता आल्याने पाण्याच्या शुद्धतेची तपासणी करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.

वाढणारी लोकसंख्या आणि त्यामानाने मर्यादित असणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यामुळे या प्रकारच्या व्यवसायासाठी मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. तरीदेखील यासाठी किंमत मोजून पाणी तपासून घेणे याला प्राधान्य दिले जात नाही.

या व्यवसायातही स्वस्तात पण फसवे अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळाही दिसतात. त्याचप्रमाणे या व्यवसायातील आणखी एक आव्हान म्हणजे लोकांना आपला दर्जा पटवून देणे आणि लोकांच्या आरोग्यासाठी जबाबदारीने सचोटीने स्वतःला वेगळे सिद्ध करणे.

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी रसायनशास्त्राची पदवी आणि तांत्रिक ज्ञान असले तरीसुद्धा व्यवसायासाठी उपयोगी पडेल, असे प्रशिक्षण या पदव्युत्तर शिक्षणात समाविष्ट नाही. त्यामुळे व्यवसायासाठी लागणाऱ्या इतर बाबी त्यांना आत्मसात कराव्या लागल्या.

त्यासाठी ‘दे आसरा फौंडेशन’ची मदत झाली, असे ते आवर्जून सांगतात. भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे प्रयोगशाळांचा दर्जा ठरविणारे प्रमाणपत्र सरकार अशा प्रयोगशाळांना देत असते. गुणवत्तेचा पुरावा म्हणून ते उपयुक्त ठरते.

विज्ञानक्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन व्यवसाय करू इच्छिणारे लोक विरळे. त्यातही वीस वर्षांपूर्वी पुण्यात पाण्याचे विश्लेषण करणारी प्रयोगशाळा सुरु करणे अधिकच आव्हानात्मक होते. परंतु चिकाटीने प्रयत्न करून त्यांनी व्यवसायात जम बसविला आहे.

देशात पदवीधारकांसाठी रोजगारनिर्मितीचे आव्हान असताना आपल्या शिक्षणाचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय कसा करावा, हे या स्वयंभू ‘सोलोप्रेनेऊर’च्या उद्यमकथेवरून दिसते.स्वी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com