

"पाणसुरुंग हुकवायचेत? मग मच्छिमारांना बोलवा!" होर्मुझच्या युद्धावर जागतिक स्तरावर न सुचलेले 'देशी' उपाय.
Sakal
होर्मुझची सामुद्रधुनी पेटली आहे. तोडगा निघण्याची गरज आहे. परंतु, ‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ असेच साऱ्यांचे चालू आहे, याचे दु:ख होते. वास्तविक आमचे ऐकले असते तर होर्मुझची सामुद्रधुनी पेटतीच ना. होर्मुझप्रश्नी आम्ही अनेक उपाय आजवर सुचवले. त्यापैकी एक जरी अमलात आणला असता तर आज होर्मुझच्या सामुद्रधुनीत पापलेटे, सरंगे, सुरमई, बांगडे मजेत पोहोत राहिले असते. होर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धनौका आणि तेलवाहू जहाजे असतात, पण तेथे मासे असतात का, हा प्रश्न आजवर एकालाही पडला नाही, हे अतिशय वेदनादायी आहे. सामुद्रधुनी असो, खाडी असो किंवा आखात असो, मासे हवेतच. इराणी लोक चहा आणि आमलेटासाठी प्रसिद्ध आहेत, पण एवढी मोठी सामुद्रधुनी असूनही त्यांना मत्स्याहाराबद्दल प्रेम नाही, याला काय म्हणावे? अहह! किंवा चूक चूक चूक!!