

The Alimony of Power: A Humorous Take on Maharashtra’s Leadership Conflict
Sakal
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : संभ्रमाची.
राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणे अंतःपुरात येरझारा घालत आहेत. काय करावे? कसे करावे? करावे की करो नये? कधी करावे? का करावे? नानाविध प्रश्नांची भेंडोळी मनात सुटत आहेत, गुंतत आहेत. हवेत दोन-तीन तलवारीचे हात करून बघतात. खांद्यात कळ मारल्याने आवरते घेतात. अब आगे...
उधोजीराजे : कोण आहे रे तिकडे?
संजयाजी फर्जंद : (लगबगीने आत येऊन) महाराजांचा विजय असो! मुजरा महाराज! बोला! कशापायी याद केलीत?
उधोजीराजे : (भडकून) याद कशाला करू? हः!! आमच्या न्याहारीची तयारी कुठवर आली?
संजयाजी फर्जंद : (अदबीनं) आमलेट तयार होतंय! डब्बल पलटी!! थोडी कळ काढा, आणतोच!!
उधोजीराजे : रोज कसली अंडी घालता...खायला?
संजयाजी फर्जंद : अंड्यात प्रथिनं असतात! संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!! अंड्याने होत आहे रे, आधी अंडेचि पाहिजे..!
उधोजीराजे : (धुमसत कडवटपणाने) अंड्यांवरून आम्हाला एक जहरी टोमणा सुचलाय, पण नाही मारत!..तुम्ही समजून घ्या!! नंतर म्हणाल, हा उधोजीराजा भारी टोमणे मारतो!! इथे महाराष्ट्रासमोर केवढा गहन प्रश्न उभा राहिलाय, आणि तुम्ही अंडी खाताय, अंडी!! कमाल आहे तुमची!!