Sambhaji nagar : पारदर्शकता ठेवण्याची अधिकाऱ्यांना दिली तंबी ;उदय सामंत

उद्योजकांनो... रस्ते कामांवर ठेवा ‘वॉच’
उद्योगमंत्री उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत sakal

छत्रपती संभाजीनगर : ‘‘इथले रस्ते होत असतानाच त्याच्या दर्जावर लक्ष ठेवा. चुकीचे काम होत असेल, पारदर्शकता नसेल तर, त्याचवेळी थेट मला सांगा. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेला रस्ता २५ वर्ष टिकला पाहिजे,’’ असा सज्जड दम उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भरला.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील रस्ते कामाचे भूमिपूजन मंगळवारी (ता. २५) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाले. त्यानंतर मसिआच्या सभागृहात उद्योजकांशी झालेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. भूमीपुजनावेळी पालकमंत्री तथा फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, माजी उपमहापौर राजू शिंदे, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांची उपस्थिती होती.

उदय सामंत म्हणाले, ‘मागच्यावेळी इथे आल्यानंतर तुम्ही मागण्या करत असताना मी झोपलो नव्हतो, म्हणून आपण ४० कोटींची मागणी केली असताना मी ७० कोटी रुपये दिले, असे म्हणत सामंत यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना टोमणा लगावला. एमआयडीसीतील रस्ते येत्या सहा महिन्यात होतील, त्यासाठी येत्या २८ एप्रिलला ठेकेदार नेमला जाणार आहे.’ उदय सामंत यांनी शब्द पाळल्याचे अतुल सावे यांनी सांगितले.

चिकलठाणा एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांच्या भूमिपुजनासोबतच शेंद्रा एमआयडीसी येथील डीएमएलटी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, स्कोडा कंपनी ते जलकुंभापर्यंत डी.आय.के.-७ प्रकारची जलवाहिनी टाकणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे आदी विकास कामांचे भूमिपुजन यावेळी पार पडले.

उद्योजकांच्या अंगावर घालतात ट्रॅक्टर : जगताप

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत ३७ वर्षांपासून जे रस्ते झाले नाहीत, त्याचे काम सुरु होत असल्याचा आनंद आहे. मात्र, याठिकाणी मुरुम चोरी मोठ्या प्रमाणात होते, त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी उद्योजकांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचे धाडस केले. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. विजेचा दर वाढले आहेत. बाजूच्या राज्यांपेक्षा अडीच रुपये जास्त आहे, याकडेही लक्ष द्यावे. अशी मागणी मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांनी केली.

मी लोकांना निदान भेटतो तरी ...

महापालिकेला कर मिळतो पण, उद्योजकांना सुविधा मिळत नव्हत्या. आधीचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मिटींग घ्यायलाही वेळ नव्हता. साडेसात वर्षात ते कधी आले, कधी गेले हे कळालेच नाही. पालकमंत्री म्हणून मी भेटतो तरी, पण आधीच्या पालकमंत्र्यांना अडीच वर्षात जिल्ह्याने पाहिले नाही. भेटले तर कामे होतात, असा टोला पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी देसाईंना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com