
प्रिय मित्र मा. नानासाहेब यांसी, स.न.वि.वि. अतिशय घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत पत्र लिहीत आहे. काल रात्री माझ्याकडे मा. बाळासाहेब आंबेडकर जेवायला आले होते.
प्रिय मित्र मा. नानासाहेब यांसी, स.न.वि.वि. अतिशय घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत पत्र लिहीत आहे. काल रात्री माझ्याकडे मा. बाळासाहेब आंबेडकर जेवायला आले होते. ते गेल्यानंतर मी बॅग भरायला घेतली. (या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. बाळासाहेबांचा आणि बॅग भरण्याचा काही संबंध नाही. कृ. नोंद घ्यावी! ) ‘तुम्ही आमच्या साइडला या’ अशी गळ मी बाळासाहेबांना घातली आहे. कारण आमच्या पक्षाचे नावच मुळी ‘बाळासाहेबांची शिवसेना आहे’ अशी मखलाशी मी केली. पण उत्तरादाखल ते फक्त जे-व-ले!! जाऊ दे.
पत्र लिहिण्याचे कारण वेगळेच आहे. आपल्याला (जोडीने) डावोसला जायचे आहे, हे मी लक्षात ठेवले होते. परंतु, अचानक तुम्ही डावोसला येणार नाही, असे कळवल्याने हादरुन गेलो आहे. तिथे मी एकटाच जाऊन काय करू? तिथे या दिवसात बरेच बर्फ पडते, असे ऐकून आहे. आपण दोघे असतो तर बर्फात थोडे खेळलो तरी असतो. फोटोबिटो काढून इथे पाठवले असते. पण आता एकटाच मी तिथे काय करणार? ऐनवेळी तुम्ही अशी टांग देणार, हे माहीत असते तर मी बॅग भरायला घेतली नसती. महाराष्ट्रासाठी गुंतवणूक आणायला आपण जोडीने जाणार होतो ना? (मी रिकामे खोके तयार ठेवले होते…) गुंतवणूक महत्त्वाची आहे. तरी तुम्ही मुंबईतच थांबायचे ठरवले, हे कसे? कृपया कळवावे. जीव थाऱ्यावर नाही. कळावे. आपला एकनिष्ठ मित्र. कर्मवीर सीएम.
ता.क. : एकट्याने एवढी गुंतवणूक कशी आणायची? प्रश्न पडला आहे. याच!
मित्रवर्य कर्मवीर सीएमसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. काही अपरिहार्य कारणामुळे तुमच्यासोबत डावोसला येणे मला शक्य नाही. सॉरी! पण मी पुन्हा येईन!!...आय मीन, पुढल्या खेपेला आपण नक्की जोडीने तेथे जाऊन दुप्पट गुंतवणूक आणू, असा शब्द देतो. तूर्त तुम्ही निश्चिंत मनाने जावे. येथील काळजी करू नये. गुंतवणूक आणणे ही काही तुम्हाला वाटते तितकी अवघड बाब नाही. सह्या तर करायच्या असतात!! नेमक्या याच सुमारास आमचे आराध्य दैवत मा. नमोजी मुंबईत येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मला थांबायला हवे!! (मी नसलो तर आमच्या पार्टीचे इतर नेते स्वागताला घुसतील, आणि नसता घोळ करुन ठेवतील. हल्ली कुणाचा भरोसा देता येत नाही. असो.) मा. नमोजींसारखी महाशक्ती आपल्या पाठीशी उभी आहे. गुंतवणुकीसाठी डावोस-फावोस हवे कशाला? त्यांनी एक फोन केला तर जगातून गुंतवणुकीचा इतका ओघ महाराष्ट्रात वाहात येईल की कितीही खोके आणले तरी गोळा करता येणार नाही. आले ना लक्षात?
डावोसला न जाता मा. नमोजींसाठी थांबणे, ही एकप्रकारे गुंतवणूकच आहे, हे तुमच्या लक्षात यायलाच हवे. मा. नमोजींच्या हस्ते काही उद्घाटने, काही लोकार्पणे, काही आश्वासने असा साग्रसंगीत कार्यक्रम पार पाडला की निम्मे काम फत्ते झालेच म्हणून समजा! महाराष्ट्रासाठी ही फार मोठी गुंतवणूक आहे बरे का! भविष्यात ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम‘च्या बैठका मुंबईत होतील, आणि देशोदेशीचे गुंतवणूकदार इथे येऊन सह्या करतील, असे स्वप्न मी पाहातो आहे. महाशक्ती पाठीशी असेल तर हे स्वप्न साकार व्हायला अडीच वर्षेही पुरतील, असे वाटते.
सध्या एकटेच जाऊन या. सह्या करा, आणि या! बर्फात खेळू नका. बाधेल! कळावे. आपला. नानासाहेब फ.
ता.क. : बाळासाहेब आंबेडकरांसोबत जेवलात? ठीकय, पण तुम्ही आमचे आहात, हे लक्षात असू द्या! नाना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.