‘धुरक्‍या’चा राक्षस (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

analysis of Hazardous smog in Delhi by Dr Shrikant Karlekar
analysis of Hazardous smog in Delhi by Dr Shrikant Karlekar

दिल्लीमध्ये धूर आणि धुक्‍याचे कण ‘धुरक्‍या’च्या रूपात मोठं संकट निर्माण करत आहेत. ‘धुरक्‍या’चा हा राक्षस केवळ दिल्लीत नव्हे, तर इतर शहरांतही आव्हान म्हणून उभा ठाकला आहे. हे ‘धुरकं’ नेमकं असतं तरी कसं, ते तयार कशामुळं होतं, त्याचे पडसाद इतक्‍या तीव्रपणे का उमटतात, त्यांच्यावर नियंत्रणासाठी काय करायला हवं आदी गोष्टींचा वेध. 


दरवर्षी भारतातल्या अनेक मोठ्या शहरांसाठी हवा प्रदूषण धोकादायक पातळीच्याही वरपर्यंत वाढण्याचा काळ म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचा कालखंड. याही वर्षी देशातली अनेक महानगरं त्याच दिशेनं वाटचाल करू लागली आहेत! दिल्ली हे या आपत्तीचं प्रातिनिधिक शहर म्हणून जगभरात चर्चेत आहे. महानगरांच्या हवेत साचणारे धूर आणि धुळीचे कण अभिशाप बनून लक्षावधी लोकांसमोर आरोग्याचं मोठं संकट उभं करीत आहेत. 

दिल्ली हे आज जगभरात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जातं. एका अंदाजानुसार, दिल्ली शहरात यामुळं दर वर्षी अकरा हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. २०१३-१४ पासून वाहनांचं वाढतं प्रमाण, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामं आणि शेतजमिनीत तृण जाळण्याच्या घटना (स्टबल बर्निंग) यामुळे प्रदूषणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दिल्लीत २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घन पदार्थांचं (सस्पेंडेड पर्टिक्‍युलेट मॅटर) वार्षिक प्रमाण १ घनमीटर हवेत १५३ मायक्रोग्रॅमइतकं प्रचंड असतं. हे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम एवढंच अपेक्षित आहे. १० मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घन पदार्थांचं वार्षिक प्रमाण १ घनमीटर हवेत २९२ मायक्रोग्रॅमइतकं असतं. यामुळं शहरात नागरिकांच्या श्वसनाच्या तक्रारींत मोठी वाढ तर झाली आहेच; शिवाय तापमानात चढ-उतार होत राहणं, दृश्‍यमानता (व्हिजिबिलिटी) कमी होणं, हवाई वाहतूक बंद पडणं या घटनांतही वाढ होतेच आहे.  

दिल्लीमध्ये हवाप्रदूषणाची ही पातळी आज इतक्‍या धोकादायक अवस्थेला पोचली आहे, की दृश्‍यता कमी झाल्यामुळं होणारे रस्त्यांवरचे अपघात, विमानांची उड्डाणं रद्द होण्याच्या घटना आणि प्रदूषित हवेमुळे शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्याचे प्रसंग यात दरवर्षी वाढच होत आहे. दिल्ली हे शहर एक मोठं ‘गॅस चेंबर’ झालंय! या वर्षी पूर्व दिल्लीत ३० ऑक्‍टोबरला १० मायक्रोमीटर आकाराच्या कणांची पातळी दर घनमीटरला १५१९ मायक्रोग्रॅम इतकी म्हणजे, प्रदूषण नियंत्रण खात्यानं निश्‍चित केलेल्या पातळीपेक्षा पंधरापट जास्त होती! त्या दिवशी रात्रीपर्यंत ही पातळी १०१६ मायक्रोग्रॅमइतकी होती. वर्ष २०१६ मध्ये दिल्लीतली वीस टक्के वाहनं २.५ मायक्रोमीटर आकाराच्या प्रदूषकांची पातळी वाढायला जबाबदार असल्याचं दिसून आलं आहे. या वर्षी वर्ष २०१८ मध्ये त्यात ४० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.     

भरपूर झाडांची लागवड, सीएनजीवर धावणारी वाहनं, पर्यावरणहितैषी दिल्ली मेट्रोची सुरवात असे प्रयत्न होऊनही शहरातल्या मोटरगाड्यांची वाढती संख्या, वाढती बांधकामं आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागांकडून शहराकडं वाहत येणाऱ्या धुराचं वाढतं प्रमाण यामुळं हे संकट कमी होण्याची लक्षणं आजही दृष्टीपथात नाहीत. 

जगातल्या अनेक शहरांतलं चित्रं
हे चित्र आता केवळ भारतापुरतंच मर्यादित राहिलं नसून, जगातील अनेक शहरं या विषारी हवा-प्रदूषणाचा सामना करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, शुद्ध हवेचे सगळे मापदंड ओलांडून बऱ्याच शहरांतल्या ऐंशी टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जनसंख्या यामुळं श्वसनविकारांनी बाधित होत चालली आहे. दिल्लीप्रमाणंच ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा), शांघाय, बीजिंग (चीन), लंडन (ब्रिटन), ग्लासगो, एडिनबर्ग (स्कॉटलंड), मेक्‍सिको सिटी, सॅंटियागो (चिली), तेहरान (इराण), लॉस अँजलिस (कॅलिफोर्निया), उल्लून बाटर (मंगोलिया), कालीमंतान (आग्नेय आशिया) अशी अनेक जागतिक शहरं आज या विळख्यात सापडली आहेत. 

भारतातही पाटना, ग्वाल्हेर, रायपूर, अहमदाबाद, कानपूर, आग्रा अशी अनेक शहरंही या समस्येनं बाधित आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर इथंही परिस्थिती फारशी वेगळी नाही. भारतातलं कानपूर शहर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या शहरातल्या २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घन पदार्थांचं वार्षिक प्रमाण १ घनमीटर हवेत ३१९ मायक्रोग्रॅम इतकं आहे. दहा मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घनपदार्थांचं हे १ घनमीटर हवेतलं प्रमाण मुंबईत १०४, तर जगातल्या इतर देशांपैकी कैरो इथं २८४, ढाका इथं १४७ आणि बीजिंग इथं केवळ ९२ मायक्रोग्रॅम इतकं आहे. दिल्लीतल्या हवेच्या प्रदूषणाचा निर्देशांक मागच्या वर्षी २ डिसेंबर रोजी ३३१ होता. तो रविवारी एकदम ३९० झाला होता. तरंगणाऱ्या सूक्ष्म प्रदूषकांची पातळी अतिउच्च होती.

प्रदूषणाचा उगम 
हवेच्या या प्रदूषणाचा इतिहास पाहता असं लक्षात येतं, की माणसानं जेव्हा आगीचा शोध लावला आणि आगीचा उपयोग लाकूडफाटा जाळण्यासाठी सुरू केला, तेव्हाच हवेच्या मानवनिर्मित प्रदूषणाला सुरवात झाली. त्यानंतर हळूहळू अशा जळण्यातून तयार झालेला धूर दाट लोकसंख्येच्या नागरी वस्त्यांवर तरंगताना दिसू लागला. औद्योगिक क्रांतीनंतर तर कोळसाही जाळला जाऊ लागल्यावर प्रदूषणाचं हे संकट आणखीनच गडद होत गेलं. 

इसवीसन १८५० च्या दरम्यान लंडन शहरावर कोळशाचा धूर आणि धुकं (Pea Soup) याच्या प्रचंड मोठ्या काळ्या दाट थरानं शहर काळवंडून जाऊ लागलं. यानं अनेकांचे बळीही घेतले. यावरूनच १९११च्या सुमारास या प्रदूषण प्रकाराला स्मॉग (smog)  म्हणजेच ‘धुरकं’ असं नाव दिलं गेलं. ‘धुरकं’ हे एकप्रकारचं दृश्‍य स्वरूपातलं प्रदूषण असून ते नायट्रोजन ऑक्‍साइड, सल्फर ऑक्‍साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्‍साईड आणि धूर यांचं मिश्रण असतं. आजकाल वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळं या प्रदूषणात मोठीच भर पडत आहे. औद्योगिक शहरांतल्या हवेत कारखान्यातल्या धुरामुळं जलशोषक अणूंचं प्रमाण जास्त असतं. यामुळं सांद्रीभवन होऊन मोठ्या प्रमाणात काळपट धुरक्‍याची निर्मिती होते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतरही बाहेर पडणाऱ्या सल्फर डायऑक्‍साइड आणि इतर सूक्ष्म कणांमुळं असं धुरकं तयार होते. याला व्हॉग (vog) असं म्हटलं जातं. 

हे प्रदूषण कमी करण्याच्या अथक प्रयत्नांनंतर लंडन शहर कोळशाचा धूर आणि धुकं यापासून मुक्त झालं; पण आधुनिक काळात वाहनांतून होणाऱ्या धुराच्या उत्सर्जनामुळं प्रदूषणाचं प्रमाण पुन्हा वाढू लागलं आहे. अमेरिकेतल्या पिट्‌सबर्ग, पेनसिल्वानिया, सेंट लुई, मिसुरी अशा अनेक शहरांत आज दिवसाही वाहनं हेडलाईट लावून चालवावी लागताहेत. १९४८ मध्ये पेनसिल्वानियातल्या डोनोरा शहरात आजूबाजूच्या डोंगरांनी बंदिस्त केलेल्या दरीत  पाच दिवस साठून राहिलेल्या धुक्‍यात शहरातल्या स्टीलचे आणि झिंक वितळवणारे कारखाने आणि सल्फ्युरिक ॲसिडचे प्लॅंट यांनी हवेत सोडलेली प्रदूषकं मिसळली गेली आणि हजारो माणसं बाधित झाली. त्यानंतर आलेल्या ‘क्‍लीन एअर ॲक्‍ट’च्या सक्तीमुळं हे प्रमाण सगळीकडंच एकदम कमी झालं.  

प्रदूषणाचं ‘रसायन’शास्त्र
हवेच्या या प्रदूषणाची पातळी प्रामुख्यानं कार्बन डायऑक्‍साइड, कार्बन मोनॉक्‍साईड, सल्फर डाय ऑक्‍साइड, सल्फर ट्रायऑक्‍साइड, नायट्रिक व नायट्रोजन ऑक्‍साइड, मिथेन, क्‍लोरोफ्लुरोकार्बन आणि हवेत तरंगणारे सूक्ष्म घन पदार्थ आणि द्रवरूपी थेंब यांमुळं वाढत असते. 

मोठमोठ्या शहरांवर आजकाल प्रकाशरासायनिक धुरकं (फोटोकेमिकल स्मॉग) आणि औद्योगिक धुरकं (इंडस्ट्रिअल स्मॉग) अशा दोन मुख्य प्रकारच्या धुरक्‍याचे (स्मॉग) प्रचंड थर आढळून येत आहेत. वर सांगितलेल्या सर्व प्रकारच्या प्रदूषकांत सूर्यप्रकाशामुळं होणाऱ्या परस्परक्रिया ज्या धूरधुक्‍याच्या निर्मितीस कारण होतात, त्यास ‘प्रकाशरासायनिक धुरकं’ म्हटलं जातं. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळं पिवळसर तपकिरी रंगाचा नायट्रोजन ऑक्‍साइड तयार होतो. मोठ्या शहरांत सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशानंतर दुपारपासूनच या पिवळसर तपकिरी धुरक्‍याचा थर दिसू लागतो. यामुळं डोळ्यांची आग होऊन ते चुरचुरू लागतात. भरपूर ऊन अनुभवणाऱ्या उबदार आणि कोरड्या हवेच्या नागरी वस्त्यांवर प्रकाशरासायनिक धुरक्‍याचा प्रभाव जास्त असतो. 

२.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान आकाराचे, आगीतून आणि डिझेल ज्वलनातून हवेत पसरणारे कण वातावरणात बराच काळ तरंगत राहतात आणि माणसांच्या फुफ्फुसांत सहज प्रवेश करतात. थंडीच्या दिवसांत दिल्लीसारख्या औद्योगिक शहरांतल्या लोकांना सल्फर डायऑक्‍साईडमुळं तयार झालेल्या सल्फ्युरिक ॲसिडच्या तरंगत्या कणांमुळं आणि उडणारी राख, परागकण, सिमेंटची धूळ, गिरणीतले पीठ पदार्थ, कोळशाची राख आणि रंगद्रव्यं अशा सूक्ष्म तरंगत्या पदार्थांमुळं (एरोसोल) तयार झालेल्या धुरक्‍याचा सामना करावा लागतो. चीन, भारत, युक्रेन आणि काही पूर्व युरोपिअन देशांत जिथं प्रदूषणनियंत्रणाचा फारसा प्रयत्न केला जात नाही, तिथं मोठ्या प्रमाणावर कोळसाज्वलनामुळं अशा प्रकारच्या धुरक्‍याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. 

कोळसा, लाकडं यांच्या ज्वलनातून आणि धुळीची वादळं, जंगलातल्या आगी याचबरोबर भारतातल्या डोंगराळ भागांतल्या सखल दऱ्याखोऱ्यांत अशी प्रदूषित हवा मोठ्या प्रमाणावर साठवली जाते. शेताची भाजावळ (क्रॉप बर्निंग), बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी प्रचंड धूळ यांचाही यात हातभार असतोच. 

शहरांबरोबर प्रदूषणाचं हे लोण आता शहरांच्या जवळ असलेल्या खेड्यांच्या दिशेनं सरकलं आहे. वर्ष २०१५ मध्येच खेड्यांतले ७५ टक्के मृत्यू हे याच कारणांमुळं झाल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. शेणाच्या गोवऱ्या, लाकूड यांच्या जाळण्यातून उत्पन्न होणारे प्रदूषित वायू याला कारणीभूत होते, असं ही  माहिती सांगते. शेतात केलेल्या भाजावळीमुळं मुंबई, चेन्नईसारख्या महानगरांच्या दिशेनं जो धूर पसरतो, त्यातून ही प्रदूषकं शहरांतल्या बांधकामांची धूळ, वाहनांतून बाहेर पडणारा धूर, फॅक्‍टरी आणि इतर उद्योगांतून सोडला जाणारा धूर यात मिसळून जातो. चुलींच्या वापरातून भारतात २५ टक्के हवाप्रदूषण होतं. शहरांजवळच्या वीटभट्ट्याही याला हातभार लावतातच. 

एका सर्वेक्षणानुसार, भारतातल्या विषारी वायूप्रदूषणाची ही समस्या कदाचित फार जुनी आहे. आजकाल प्रत्येक शहराभोवती आणि आजूबाजूच्या भागांत हे वायूप्रदूषण मोजण्याचं प्रमाण वाढल्यामुळं ते लक्षात येऊ लागलं आहे. प्रदूषण मोजण्याचं हे प्रमाण सगळीकडं जसं वाढेल, तसं भारतातल्या आणखी अनेक ठिकाणांनी ही पातळी यापूर्वीच गाठली असल्याचंही लक्षात येण्याची शक्‍यता आहे. 

शहराचा भूगोल, भूरूपिकी (जिओमॉर्फोलॉजी), हवामान, लोकसंख्येची घनता, औद्योगिक संकुलांची संख्या, छोट्या मोटारी आणि ट्रक यांची संख्या आणि इंधनांचा वापर अशा सगळ्याच गोष्टींवर हवाप्रदूषणाचं प्रमाण ठरतं. 

जिथं पर्जन्यवृष्टी किंवा हिमवृष्टी जास्त असते, अशी शहरं मात्र नैसर्गिक दृष्ट्या या प्रदूषणातून मुक्त असतात. समुद्रकिनारी असलेली शहरंही या बाबतीत थोडी जास्त नशीबवान असतात. कारण जमिनीकडून समुद्राकडं वाहणाऱ्या हवेतली तरंगती प्रदूषकं, समुद्राकडून येणाऱ्या खारट समुद्री हवेच्या फवाऱ्यामुळं नष्ट केली जातात. किनाऱ्यांवर उंच इमारती असल्या, तर मात्र हा परिणाम थोडा कमी दिसतो. जिथं वारे जास्त वेगाने वाहतात तिथंही हवेतली प्रदूषकं इतरत्र वाहून नेली जातात. मात्र, ज्या दिशेनं ती वाहत जातात, त्या बाजूकडची ठिकाणं प्रदूषणग्रस्त होतात.

मोठ्या शहरांतल्या उंच इमारतींमुळं वाऱ्याचा वेग रोखला जातो आणि हवेतली प्रदूषकं तिथंच घुटमळत राहतात. डोंगराळ प्रदेशातल्या नागरी वस्त्यांतही सखल भागात प्रदूषकं साचून राहतात. ती इतरत्र पसरू शकत नाहीत. तापमानाच्या विपरिततेमुळे (टेम्परेचर इन्व्हर्जन) धुकं आणि त्याबरोबर प्रदूषकंही दरीत साचतात आणि प्रदूषण पातळीत वाढ होते. 

‘अर्बन स्प्राल’ ही समस्या
अनेक पर्यावरणवाद्यांच्या मते, नागरीकरण (अर्बनायझेशन) ही खरं म्हणजे समस्या नसून नागरी वस्त्यांची सर्व दिशांनी होणारी वाढ (अर्बन स्प्राल) ही समस्या आहे! यामुळं आजूबाजूच्या मोठ्या ग्रामीण, प्रदूषणविरहित, स्वच्छ परिसराचा ऱ्हास होण्याची शक्‍यता वाढत असते. 

दिल्लीत बांधकाम व्यवसायातले स्टोन क्रशर, हॉट मिक्‍स प्लांट यांवर निर्बंध, कोळसा आणि जैवराशी (बायोमास) वापरणाऱ्या उद्योगांवर नियंत्रण, वीटभट्टयांवर बंधन, खासगी वाहनांच्या विशेषतः डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या वापरावर नियंत्रण, कचरा जाळण्यावर बंदी आणि नोव्हेंबर महिन्यांत औद्योगिक उलाढाली पूर्णपणे बंद ठेवण्याचे प्रयत्न अशा अनेक सूचना प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. 

उत्तर भारतात नोव्हेंबरमध्ये पश्‍चिमी अडथळ्यांमुळं (वेस्टर्न डिस्टर्बन्स) पाकिस्तान आणि थरच्या वाळवंटाकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळं आणि प्रत्यावर्त (अँटिसायक्‍लोन) निर्मितीमुळं या समस्येची तीव्रता आणखीनच वाढते. पंजाब आणि हरियाना या शेतीप्रधान राज्यांतून शेतजमिनीत तृण जाळण्याच्या घटनांमुळं तयार होणाऱ्या धुरात ही वाहत येणारी धूळ मिसळून गेल्यामुळं तीव्रता अजून वाढते. वाऱ्याचा वेग कमी झाल्यावर ही प्रदूषकं हवेत साचून राहतात आणि कालांतरानं खाली बसतात. दिल्ली आणि उत्तर भारतातल्या प्रदूषणाबाबतीत ही नैसर्गिक कारणंही तितकीच महत्त्वाची असतात. 

दिल्लीसारखी शहरं अधिक शुद्ध, स्वच्छ हवेची, प्रदूषणमुक्त आणि जगण्यासाठी योग्य बनवणं हे खरं तर या समस्येचं योग्य उत्तर आहे. यासाठी शहरांचं पर्यावरणहितैषी अशा ग्रीन सिटी किंवा इको सिटीमध्ये रूपांतर करणंही आता गरजेचं आहे. अशा शहरात मुख्य भर हा प्रदूषणावर पूर्ण नियंत्रण, कचरानिर्मितीत घट आणि सौरशक्ती वापरून त्याचा पुनर्वापर यावर असावा. शहरातल्या आणि आजूबाजूच्या प्रदेशातल्या जैवविविधतेचं रक्षण करणं आणि त्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणं या गोष्टींनाही इथं प्राधान्य हवं. ही शहरं लोकाभिमुख हवी, ती वाहनाभिमुख (कार ओरिएंटेड) नसावी.

उपाय काय?
मुंबई, कोलकाता, चेन्नई  यांसारख्या शहरांतल्या खाड्या, नद्या वारंवार स्वच्छ करून, त्यांच्या पर्यावरणाची सुधारणा किंवा पुनर्निर्मिती; तसंच दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर अशा शहरांच्या नदी पर्यावरणात सुधारणा, वृक्षांची भरपूर लागवड, टेकड्यांच्या पर्यावरणाची सुरक्षितता आणि शहराच्या सर्व दिशांनी वाढणाऱ्या सीमेवर नियंत्रण असे अनेक उपाय प्रदूषणनियंत्रणाच्या संदर्भात अभ्यासकांनी मांडले आहेत. 

इको सिटीचे यशस्वी प्रयोग याआधीही अनेक ठिकाणी झालेत. ब्राझिलमधील क्‍युरिटिबा, न्यूझीलंडमधील वैताकेरी, फिनलॅंडमधील टॅपिओला, ओरेगॉनमधील पोर्टलॅंड आणि कॅलिफोर्नियातील डेव्हिस अशी अनेक उदाहरणं देता येतील. यातल्या अनेक इकोसिटीजमध्ये प्रदूषण नष्ट करण्यात उत्तम सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा खूप मोठा हातभार आहे. स्वच्छ, स्वस्त, सोयीस्कर, सक्षम आणि पुरेशी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा शहराला हवेच्या प्रदूषणापासून किती चांगल्या प्रकारे मुक्त करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्राझिल या विकसनशील देशातलं क्‍युरिटिबा हे शहर! 

दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई, पुणे, बंगळूर अशा सर्वच शहरांतील वाढत्या प्रदूषणसमस्येवर अशा तऱ्हेचाच उपाय करणं योग्य ठरेल. शहरांतल्या प्रदूषणनियंत्रणासाठी जगात इतरत्र झालेले प्रयोग आपल्याकडं जसेच्या तसे लागू करता येतील, असं मुळीच नाही. आपल्या शहरांचा भूगोल, इतिहास, वाढ आणि विकास व पर्यावरण हे सगळं इतकं वेगळं आहे. त्या प्रत्येकाचा विचार करूनच आपल्याला अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय शोधावे लागतील. परदेशातून आणून आपल्याकडं सुरू केलेल्या अनेक वाहतूक योजनांचा आपल्या शहरांतून कसा बोजवारा उडाला आहे, ते आपण पाहतोच आहोत!

आपल्याकडची बरीचशी शहरं मुळातच कुठलंही नगरनियोजन नसताना वाढली. वेड्यावाकड्या पद्धतीनं आणि जागा मिळेल तशी आणि तिथं वाढलेल्या शहरांतून मार्ग काढून उपाय शोधण्याची गरज आहे आणि ते शोधायला निश्‍चितच अजूनही अनेक संधी आहेत. वर्षागणिक वाढणारी वाहनसंख्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारी अनिर्बंध बांधकामं यावर नियंत्रण ठेवलं, तरी दिल्ली आणि अर्थातच पुणे, मुंबईसारख्या शहरांतल्या समस्या कमी करता येतील. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता ही शहरं किनारी असून, त्यांचे हवाप्रदूषणाचे प्रश्न सागरी हवामानाशी निगडित आहेत, तर दिल्ली, पुणे ही शहरं समुद्रापासून दूर असल्यामुळं तिथल्या समस्या वेगळ्या आहेत. असं असलं, तरी प्रदूषणाच्या या समस्येच्या मुळाशी जागा मिळेल तशी वाढत राहण्याची शहरांची वृत्ती आणि खासगी वाहनांचा अमर्याद वापर यामुळं भारतातली सगळीच शहरं या भस्मासुराच्या लवकरच कचाट्यात सापडणार आहेत हे नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com