जगण्याचं ‘तंत्र’... आजचं, उद्याचं! (अच्युत गोडबोले)

Achyut-Godbole
Achyut-Godbole

‘इन्फोटेक’नं आधी उद्योगांमध्ये पाऊल ठेवलं आणि आता मात्र त्यानं आपल्या रोजच्या जीवनातही शिरकाव केलाय. २५ एक वर्षांपूर्वी आपल्याकडे ना ई-मेल आयडी होता, ना मोबाईल फोन! आज मात्र या सगळ्यांशिवाय जगण्याचा विचारही कोणी करू शकत नाही. एखाद्या बँकेला जर ‘तुम्ही इन्फोटेक वापरणं बंद करा’ असं आज सांगितलं, तर ती बँक चक्क कोसळेलच! म्हणजे इन्फोटेक आता फक्त आपली कार्यक्षमता किंचितशी वाढवण्यापुरती सीमित न राहता, उद्योगांचा किंवा कामांचा एक महत्त्वाचा अविभाज्य भागच बनलेलं आहे. कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स (आयटी), बायोटेक्नॉलॉजी (बीटी) आणि नॅनोटेक्नोलॉजी (एनटी) अशा एकमेकांत गुंतणाऱ्या आणि एकमेकांना पूरक ठरू शकणाऱ्या तंत्रज्ञानांची प्रगती पुढच्या फक्त काही दशकांतच प्रचंड प्रमाणात होणार आहे. 

गेले वर्षभर चालेल्या ‘इन्फोटेक’ या मालिकेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. मला आलेले शेकडो ई-मेल्स, पत्रं, फोन्स; तसंच मेसेजेस यांवरून वाचकांना ही मालिका प्रचंड आवडल्याचं लक्षात येत होतं आणि पुढे लिहिण्याचा हुरूप वाढत होता.   

‘इन्फोटेक’ आज आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आणि गरज बनलीय. ते अगदी हवा, पाणी, अन्न आणि कपडे यांच्या यादीत जाऊन बसलं आहे. याच इन्फोटेकची ओळख आपण गेले वर्षभर करून घेत होतो. ऑगमेंटेड/व्हर्च्युल रिअॅलिटी, गुगल ग्लास, क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा एन्क्रिप्शन/कॉम्प्रेशन, सेन्सर्स, एम्बेडेड सिस्टिम्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिटकॉईन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मल्टिमीडिया, सॅटेलाईट्स, जीपीएस/गुगल मॅप्स अशा इन्फोटेकच्या विविध अंगांचा तर आपण परिचय करून घेतलाच; पण आपण दररोज वापरतो तो मोबाईल नेमका चालतो कसा? 1G, 2G, 3G, 4G आणि 5G या आपण रोज ऐकत असणाऱ्या संज्ञांचा अर्थ काय आहे? इंटरनेट चालतं कसं?, किंवा आपण पाठवलेला ई-मेल आपल्या इच्छित माणसापर्यंत जातो कसा? या प्रश्नांची तांत्रिक उत्तरं आणि यामागच्या गमतीजमती याचीही आपण सफर केली.

या सगळ्या पैलूंचा या मालिकेत अल्पपरिचयच शक्य होता. कारण शब्दसंख्येचं बंधन असल्यामुळे मर्यादा पडल्या. त्यामुळे अनेक मुद्दे, अनेक पैलू लिहायचे राहून गेले. उदाहरणार्थ, उद्या जगात धुमाकूळ घालायला सज्ज असलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची नुसती तोंडओळखच करून देता आली. त्यातले मशीन लर्निंग, डीप लर्निंग, रोबॉटिक्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेलिंग अशा संकल्पना; तसंच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर आर्किटेक्चर, ऑपरेटिंग सिस्टिम्स, प्रोग्रॅमिंग, व्हायरस, ईआरपी, सप्लाय चेन मॅनेजमेंट अशा अनेक गोष्टींविषयी लिहायचं राहूनच गेलं. माझ्या ‘इन्फोटेक’ या आगामी पुस्तकात मात्र या सर्वांवर सविस्तर विवेचन वाचकांना वाचायला मिळेल. 

‘इन्फोटेक’नं आधी उद्योगांमध्ये पाऊल ठेवलं आणि आता मात्र त्यानं आपल्या रोजच्या जीवनातही शिरकाव केलाय. २५ एक वर्षांपूर्वी आपल्याकडे ना ई-मेल आयडी होता, ना मोबाईल फोन! १५ वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे फेसबुक अकौंटही नव्हता; पण आज मात्र या सगळ्यांशिवाय जगण्याचा विचारही कोणी करू शकत नाही. एखाद्या बँकेला जर ‘तुम्ही इन्फोटेक वापरणं बंद करा’ असं आज सांगितलं, तर ती बँक चक्क कोसळेलच! म्हणजे इन्फोटेक आता फक्त आपली कार्यक्षमता किंचितशी वाढवण्यापुरती सीमित न राहता, उद्योगांचा किंवा कामांचा एक महत्त्वाचा अविभाज्य भागच बनलेलं आहे. कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स (आयटी), बायोटेक्नॉलॉजी (बीटी) आणि नॅनोटेक्नोलॉजी (एनटी) अशा एकमेकांत गुंतणाऱ्या आणि एकमेकांना पूरक ठरू शकणाऱ्या तंत्रज्ञानांची प्रगती पुढच्या फक्त काही दशकांतच प्रचंड प्रमाणात होणार आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणं हे शतक आयटी, बीटी आणि एनटी यांचं असणार आहे.

खरंच काय काय गोष्टी होण्याची शक्यता आहेत उद्याच्या जगात?
इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सुधारित रेझिस्टर्स, इंडक्टर्स आणि कपॅसिटर्स यांच्या जोडीला आलेल्या ‘मेम्रिस्टर’ या चौथ्या घटकामुळे सगळ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती आणि त्यांचे आकार प्रचंड घटतील आणि त्यांचा वेगही वाढेल. विशेष म्हणजे बाह्य परिस्थितीप्रमाणं गुणधर्म बदलणारी उपकरणं बनवणंही शक्य होईल. सन २००९ मध्ये निघालेला कॉम्प्युटर दर सेकंदाला १०१५ गणितं सोडवण्यात पटाईत होता. त्यानंतर सन २०१८ मध्ये दर सेकंदाला १.५ X १०१७ गणितं करू शकणारा कॉम्प्युटर निघाला. सन २०२१ पर्यंत दर सेंकदाला १.५ X १०१८ एवढी गणितं करणारा सुपरकॉम्प्युटर निघेल, तर दर सेकंदाला १०२१ गणितं सोडवू शकणारा कॉम्प्युटर २०२९ पर्यंत निघेल. हे सगळे कॉम्प्युटर्स वजनाला खूप हलके, स्वस्त आणि टिकाऊ असतील. कॉम्प्युटरचा आकार प्रचंड वेगानं कमी होतोय. १९६० च्या दशकातल्या आवाढव्य मेनफ्रेम्सची जागा १९७० च्या दशकाततल्या मिनिकॉम्प्युटर्सनी आणि नंतर त्यांची जागा १९८० च्या दशकात मायक्रोकॉम्प्युटर्सनी घेतली. त्याचवेळी डेस्कटॉप आला. त्यानंतर लॅपटॉप आणि नोटपॅड आले आणि आता मनगटावर घालता येईल असा ‘रिस्टटॉप’ही आलाय. ० आणि १ भाषेत माहितीचा साठा करणं आणि त्याची गणितं करणं, माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवणं यासाठी आतापर्यंत इलेक्ट्रॉन्सचा वापर करण्यात येत होता. आता मात्र ‘ऑप्टिकल’ कॉम्प्युटर्समध्ये प्रकाशाचे फोटॉन्स वापरले जातील. भराभर गणितं करणं, माहिती साठवणं यासाठी डीएनए वापरून बनवले जातील. डीएनएमध्ये १ लाख कॉम्प्युटर्सची माहिती साठवण्याची क्षमता असते आणि ते अतिसूक्ष्मही असतात; पण आता येणारे नॅनोकॉम्प्युटर्स याहीपेक्षा प्रगत असतील. 

क्वांटम कॉम्प्युटर्स हे तर कॉम्प्युटर्सना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील. साध्या कॉम्प्युटर्समध्ये माहिती ही ० आणि १ अशा ‘बिट्स’मध्ये साठवली जाते. क्वांटम कॉम्प्युटर्समध्ये मात्र ही माहिती ‘क्वांटम बिट्स’ म्हणजेच ‘क्युबिट्स’मध्ये साठवली जाईल. या कॉम्प्युटरला एकाच वेळी कोट्यवधी गणितं प्रचंड वेगानं सोडवता येतील. मुख्य म्हणजे यातल्या ‘एन्क्रिप्शन’च्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आपले ‘ऑनलाईन व्यवहार’ सुरक्षित राहतील! गंमत म्हणजे हे कॉम्प्युटर्स उद्या AIचा वापर करून स्वत:च, स्वत:साठी उपयुक्त असे प्रोग्रॅमिंग्जही लिहू शकतील असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

याशिवाय आणखीही कित्येक भन्नाट गोष्टी घडतील. उदाहरणार्थ, आपल्या कपड्यांवरच्या चिप्समुळे आपण चालताचालता शीतपेयांच्या किंवा इतर जहिरातींचे व्हिडिओज दाखवू शकू आणि त्याबद्दल आपल्याला त्या कंपन्यांकडून पैसेही मिळतील. वर्तमानपत्रांवरही अतिसूक्ष्म चिप्स बसवलेल्या असल्यामुळे कुठल्याही बातमीवर (उदाहरणार्थ, दंगल, युद्ध, भाषण) आपण किंचितसं दाबलं, की आपण त्या बातमीच्या संबंधीचे व्हिडिओज बघू शकू. तसंच प्रत्येकाच्या शरीरावर असंख्य अतिसूक्ष्म असे सेन्सर्स, चिप्स आणि कॅमेरे अशा गोष्टी बसवलेल्या असतील. त्यामुळे मुलं किंवा अल्झायमर झालेले रुग्ण हरवणारच नाहीत. इतकंच नाही, तर आपल्या शरीराचं तापमान, रक्तदाब, नाडीचे ठोके, लघवी, रक्त, थुंकी, स्टूल वगैरे गोष्टींवर दर क्षणाला लक्ष ठेवून त्यातल्या बदलांची नोंद होईल. यात काही जरी गडबड वाटली, तरी प्रथम डॉक्टरला आणि फारच गडबड (उदाहरणार्थ- अॅटॅक) असेल, तर ताबडतोब हॉस्पिटलला किंवा अॅम्ब्युलन्सला फोन जाईल. त्यामुळे अकाली मृत्यू टळतील.

एकट्या राहणाऱ्या वयस्कर मंडळींना तर हे तंत्रज्ञान वरदानच ठरेल. औषधं किंवा इंजेक्शन्स चिप्सच्या (खाण्याचे वेफर्स नव्हे!) मदतीनं दिली जातील. एखादा लहानसा कापडाचा तुकडा वाटावा अशा खास तऱ्हेच्या चिप्स कातडीवर ठेवल्या, की त्यातून औषध आपोआप शरीरात जाईल आणि आपलं काम करेल. 

उद्याच्या ऑफिसचं स्वरूपही बदलेल. सगळी माणसं चक्क घरी बसूनच काम करायला लागतील. त्यामुळे जगातली सगळ्या कंपन्यांची, बँकांची, इन्श्युरन्स कंपन्यांची आणि इतरही सगळी ऑफिसेस चक्क म्युझियम्स बनतील! याचं कारण काम आपल्याकडे येईल; आपण कामाकडे जाण्याची गरजच राहणार नाही. एक बारीकसा कॅमेरा आणि कॉम्प्युटर सतत प्रत्येकाच्या खिशात असेल. मॅनेजरला जर एखादी मीटिंग घ्याची असेल, तर तो आपल्या सेक्रेटरीला (जीदेखील तिच्या घरी किंवा कुठंही असेल) कॉम्प्युटरच्या किंवा फोनच्या मदतीनं सांगेल. मग ती सेक्रेटरी ज्यांना मीटिंगला बोलवायचं आहे त्यांना संदेश पाठवेल, चर्चेचा विषय पाठवेल आणि प्रत्येक जण आपापल्या घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करेल. चर्चेदरम्यान आलेख किंवा आकृत्या याही सगळ्यांना दाखवता किंवा बघता येतील. कामासाठी प्रवासाची गरजच उरणार नाही. 

याचीच पुढची पायरी म्हणजे शाळा-कॉलेजेससुद्धा आत्तासारखे राहणार नाहीत. त्यांच्याही इमारती म्हणजे म्युझियम्स बनतील. सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन शिकणं-शिकवणं याची गरजच उरणार नाही. कारण सगळ्या विषयांचे उत्कृष्ट व्हिडिओज उपलब्ध असतील. हे बघूनच घरी बसल्याबसल्या सगळे विद्यार्थी शिकतील. या व्हिडिओजमध्ये प्रयोगशाळेतले प्रयोगही दाखवता येतील किंवा सिम्युलेट करता येतील आणि घरबसल्या बघता/करता येतील. शिक्षकांचं काम रोज फळ्यावर शिकवण्याऐवजी फॅसिलिटेटरचं होईल. शिक्षणाचे व्हिडिओज तयार करणं, ठराविक वेळी मुलांच्या शंका व्हिडिओ कॉन्फरन्सनं सोडवणं आणि चाचण्या घेणं एवढंच त्यांचं काम राहील. खऱ्या अर्थानं ‘डेथ ऑफ डिस्टन्स’ शक्य होईल आणि यामुळे प्रचंड प्रवासखर्च, पेट्रोल, डिझेलही वाचेल. याचबरोबर लोकांना आपल्या घरच्यांसाठी, कुटुंबांसाठी वेळही देता येईल. मुलं आणि माणसं एकत्र येतील आणि प्रवास करतील; पण ते सहलीसाठी, खेळासाठी, पोहण्यासाठी, वाचनासाठी, संगीतासाठी, मौजेसाठी आणि अशा अनेक गोष्टींसाठी. प्रवासाची सक्ती राहणार नाही. 

सन २०४० पर्यंत मेसेजेस आणि एकूण संभाषणात तर प्रचंड क्रांती घडेल! म्हणजे डोक्याला विशिष्ट मास्क घालून, आपल्या मेंदूतल्या विचारांनी निर्माण होणाऱ्या विद्युतलहरी टिपून, त्यामागचे विचार ओळखून ते आपल्याला पाहिजे असल्यास आपण वायरलेस पद्धतीनं दुसऱ्याकडे पाठवू शकू. म्हणजे ना बोलण्याचा प्रश्न आणि ना कुणाला बेत कळण्याचा!! याला ‘सिंथेटिक टेलिपथी’ म्हणतात. प्रेमिकांसाठी तर हे तंत्रज्ञान उपयुक्त आहेच; पण विशेषकरून सुरक्षा यंत्रणांना एकमेकांना गुप्त संदेश पाठवण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरेल. 

सगळी वर्तमानपत्रं, पुस्तकं आणि पत्रव्यवहार डिजिटल होईल. त्यामुळे हजारो वाचनालयांऐवजी फक्त सर्व्हर्स शिल्लक राहतील, आणि या सगळ्यांच्या इमारतींची म्युझियम्स होतील!

अनेक हॉटेल्समध्ये, अवकाशात, दवाखान्यात, कारखान्यात, ऑफिसेसमध्ये; तसंच अनेक उद्योगांमध्ये जिथं धोकादायक कामं होतात तिथं रोबोज आजही आपली कामगिरी बजावताहेतच; पण उद्या रोबोज घरातही शिरकाव करतील. म्हणजे ते घरातले केर-वारे करतील, भाजी निवडतील, स्वयंपाक करतील, भांडी घासतील, लहान मुलांची आणि घरातल्या वृद्धांची काळजी घेतील, त्यांच्याशी गप्पा मारतील, वेळप्रसंगी औषधोपचारही करतील.... थोडक्यात संपूर्ण घर सांभाळतील. हे एकट्या राहणाऱ्या वृद्धांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. 

उद्याच्या जगात कॉम्प्युटरच्या मदतीनं बायोटेक्नॉलॉजीत मोठे प्रकल्प करण्याचा मानस आहे. सन २००० मध्ये ‘ह्युमन जीनोम’ प्रकल्प पूर्ण झाला. त्यातून मानवी आनुवांशिक गुणधर्माला जबाबदार असलेले जीन्स एकेकटे किंवा इतर जीन्सच्या सहाय्यानं कुठल्या मानवी गुणधर्माला जबाबदार असतात हे शोधून काढण्यात आलं. आता हवे त्या गुणधर्म असलेले जीन्स वापरून; तसंच डीएनए रेणूची पीळ आणि वीण वाढवून चक्क ‘चिरतरुण’ कसं राहता येईल यावर संशोधन चालू आहे. यामुळे सरासरी आयुष्यमान कालांतरानं १००, १२०, १५० आणि २०० वर्षं इतकं होऊ शकेल; पण मग एवढी वर्षं करायचं काय असा प्रश्न पडेल. मग एखादा १०० वर्षांचा वृद्ध एखादी गोळी घेऊन १५ एक वर्षं ‘झोप’ काढेल आणि उठल्यावर परत हा ‘तरुण’ झालेला वृद्ध नव्या जगामध्ये नवे सिनेमे, नवी हॉटेल्स, नवे मित्र-मैत्रिणी शोधेल. असं ३०-४० वर्षं मजा केल्यावर पुन: एक गोळी घेऊन १५-२० वर्षं झोप काढेल वगैरे. 

बँका आणि पैसा यांचं स्वरूपच यापुढे बदलणार आहे. नोटा, नाणी, चेक्स, क्रेडिट-डेबिट कार्ड्‌स या सगळ्या गोष्टी कालबाह्य होतील. पैसा म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक हालचाल इतकंच शिल्लक राहील. माझा बँक बॅलन्स माझ्या मोबाईलमध्ये ० आणि १ च्या स्वरूपात असेल. माझा पगार इलेक्ट्रॉनिकली माझ्या मोबाईलमधल्या ‘बँकेत’ जमा होईल. मी त्यातूनच पेटीएमसारख्या अॅपमधून खरेदी करू शकेन. 

नॅनोटेक्नोलॉजीनंतर दुसऱ्याला आपण न दिसणं, मूड बदलता येणं, मोटारीचा रंग क्षणात पाहिजे तसा बदलता येणं, घडी करून खिशात मावू शकेल असे टीव्हीज घेऊन फिरणं अशा असंख्य गोष्टी होऊ शकतील. 

खरं तर यातल्या अनेक गोष्टी आता शक्य व्हायला लागल्या आहेत. त्या अजून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचलेल्या नसल्या, तरी अनेक ठिकाणी त्यांचा वापर होतोय; पण उद्या त्या सर्वसामान्यांपर्यंत पोचून आपली जीवनशैली नखशिखांत बदलून टाकतील. उद्याच्या जगात ‘आयटी’; तसंच बीटी आणि एनटी अजून काय धुमाकूळ घालणार आहेत किंवा घालताहेत याची यादी प्रचंड मोठी आणि काही तर कल्पनेच्या बाहेरची आहे. अर्थात यात गोष्टी इतक्या भराभर बदलतील, की तरुण पिढीला सतत बदलाला सामोरं जावं लागेल. जे हे बदल स्वीकारतील, तेच या स्पर्धेत टिकतील; बाकीचे फेकले जातील. या सगळ्यामध्ये बेरोजगारीही वाढण्याची शक्यता आहे; पण त्याविषयी नंतर कधीतरी. 

शेवटी काय तर ‘तंत्रज्ञान’ हे आपल्याला मानवी प्रगतीच्या कोणत्या पायरीवर नेऊन ठेवणार आहे, हे काळच ठरवेल! ‘इन्फोटेक’विषयी गप्पा मारताना या सगळ्या प्रवासात या वर्षी मला प्रचंड मजा आली. तुम्हालाही आली असेल, अशी आशा करतो. पुन्हा केव्हा तरी भेटूच; पण सध्यातरी नववर्षाच्या शुभेच्छा आणि गुड बाय!!

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com