

Aam Aadmi Party Split 2026
esakal
अण्णा आंदोलनाचं यशस्वी बाय प्राॅडक्ट म्हणून ‘आप’कडं पाहिलं जात होतं. त्या आंदोलनातील भूमिकांपासून त्यांनी कधीच फारकत घेतली. त्याचं राजकारण आधी दिल्लीनंतर पंजाब आणि पुढं जमेल तसं काॅंग्रेसला पर्याय म्हणून उभं राहण्याच्या दिशेनं जाऊ लागलं. केजरीवाल यांना काही ठोस भूमिकेसाठी साथ देणारे योगेंद्र यादव, प्रशांत भूषण ते पत्रकार आशुतोष अशा अनेकांनी वेगळा रस्ता धरला तो केजरीवाल यांच्या एकतंत्री कारभारामुळे. पक्षात अन्य कोणतंही नेतृत्व उभं राहणार नाही, पक्षात कोणीही प्रश्न विचारणार नाही, याची निश्चिती केजरीवाल यांनी केली, ते हायकमांड बनले.
‘आम आदमी पक्ष’ या नावानं देशाचं राजकारण बदलण्याची गर्जना करत सुरू झालेलं भारतातील राजकीय स्टार्ट-अप अरविंद केजरीवाल यांची एकाधिकारशाही शैली आणि या पक्षात सत्ता आणि प्रसिद्धीसाठीच आलेल्यांच्या कर्तृत्वानं आणखी एका प्रचलित राजकीय पक्षात बदललं आहे. अन्य पक्षाचे नेते फुटतात तसं आपचे नेतेही फुटतात, हे या बदलाचं ताजं लक्षण. यापूर्वीही या पक्षातील अनेक जण बाहेर पडले. काहींना केजरीवाल आणि कंपूनं बाहेरचा रस्ता दाखवला, मात्र आता राघव चढ्ढा आणि कंपनी यांनी राज्यसभेतील आप पक्षच भाजपमध्येच विलीन करायचा निर्णय घेतला हे ‘आप’साठी धक्कादायक, भाजपच्या सत्तेसाठी वाटेल ते करायच्या वाटचालीचं निदर्शक आणि भारताच्या राजकारणात नवं काही घडवण्याच्या ‘आप’कडून असलेल्या अपेक्षांच्या भ्रमाचा भोपळा फुटल्याचं लक्षण आहे. केवळ भ्रष्टाचाराला विरोध आणि आम्ही स्वच्छ बाकी सारे भ्रष्ट या प्रकारच्या कथनातून काही काळ लोक जमवता येतात. भाबड्या मंडळींच्या फौजा मागं उभ्या करता येतात, पण दीर्घकाळाचं राजकारण करायचं तर काहीतरी ठोस विचारसरणी लागते, नेमकी त्याची वानवा ‘आप’मध्ये आहे. केजरीवालांचा तुच्छतावाद विचारसरणीचा पर्याय असू शकत नाही, हे कालपरवापर्यंत भाजपच्या पक्ष फोडण्याविरोधात गरजणारे चढ्ढा आणि सहा खासदार भाजपमध्ये अलगद पोचल्यानं स्पष्ट होतं. यंत्रणांचा धाक कारवाईची भीती हीच आप फुटण्यामागील कारणं असतील, तरीही पक्षानं तडजोड करावी लागेल अशांना इतकं मोठं का करावं, हा प्रश्न उरतोच.