

India's T20 World Cup 2026 Victory
esakal
जयेंद्र लोंढे
टी-२० विश्वकरंडकातील काही क्षण सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहेत. त्यात उपांत्य फेरीतील जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर अक्षर पटेल याने २४ मीटर उलटे धावत जाऊन हॅरी ब्रुकचा टिपलेला झेल डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. याच लढतीत अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर विल जॅक्सला बाद करण्यासाठी अक्षरने हवेत उडणारा चेंडू अलगदपणे झेलला; पण सीमारेषेबाहेर तोल जात आहे, हे लक्षात घेत त्याने तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये असलेल्या शिवम दुबेकडे सोपवला... विजेतेपदाचे ‘अक्षर’विश्वकरंडक जिंकण्यासाठी मोलाचे ठरले आहे.
भारतीय क्रिकेट संघाला २०२३मधील एकदिवसीय विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि २०११नंतर विश्वविजेतेपद पटकावण्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला होता. त्यानंतर मात्र २०२४ ते २०२६ या तीन वर्षांमध्ये भारताने ३६० डिग्रीप्रमाणे कायापालट करून आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात २०२४मध्ये टी-२० विश्वकरंडक पटकावल्यानंतर पुन्हा त्याच्याच नेतृत्वात २०२५मध्ये ‘चॅम्पियन्स करंडक’ उंचावत भारताचा झेंडा रुबाबात फडकवला. यंदा मायदेशात सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी-२० विश्वकरंडक पटकावण्याची किमया करून दाखवली. या तीनही विजेतेपदाचा मान काही मोजक्याच खेळाडूंना मिळाला आहे. हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव या तीन खेळाडूंसह अक्षर पटेल या खेळाडूचा यामध्ये समावेश आहे.