

India Strategic Autonomy
esakal
सम्राट फडणीस
ब्रिक्स देशांच्या दिल्लीत नुकत्याच झालेल्या परिषदेत नरेंद्र मोदी, शी जिनपिंग आणि पुतीन हातात हात घालून चालत असलेला फोटो जगभर झळकला आणि तोच या परिषदेचा सर्वाधिक बोलका क्षण ठरला. भारत कुणा एकाच्या दावणीला बांधलेला नाही, हे या एका छायाचित्रानं जगाला सांगितलं. बदलत्या जागतिक परिपेक्षात स्वतःचं हित साधत, कोणा एकाची बाजू न घेता आपली ‘सामरिक स्वायत्तता’ जपणं हे भारताचं भविष्यातील धोरण असणार, हेही परिषदेतून स्पष्ट झालं.
सप्टेंबर १२, २०२६. पहाटेची वेळ. बीजिंगहून एक खास विमान दिल्लीच्या दिशेनं झेपावलं. विमानात होते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. गेल्या सात वर्षांत जिनपिंग यांनी भारतभूमीत प्रवेश केला नव्हता. २०१९च्या ऑक्टोबरमध्ये ते मामल्लापुरमच्या समुद्रकिनारी मोदींसोबत अनौपचारिक गप्पा मारत बसले होते, तेव्हा दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्याच्या मार्गावर होते. काही महिन्यांतच गलवानमध्ये रक्त सांडलं आणि उभय देशांमधले संबंध एका झटक्यात गोठून गेले. आता, सात वर्षांनी, तेच शी जिनपिंग दिल्लीत उतरत होते...यावेळी शांत समुद्रकिनारा नव्हता, तर डझनभर जागतिक नेत्यांच्या साक्षीने रचला जाणारा एक औपचारिक, झळाळता रंगमंच होता. इतिहासानं जणू एक वर्तुळ पूर्ण केलं होतं.