

Mother India Nargis Sunil Dutt fire
esakal
हजारो हात लागतात त्या सिनेमाच्या मिश्र माध्यमाची कला मोठी लोभस पण जीवघेणी. इथे प्रत्येक जण आपापल्या कामाची एखादी तरी खूण उरावी यासाठी जीव टाकत असतो. ‘मदर इंडिया’साठी मेहबूब खानसारखा निर्माता आपलं सर्वस्व पणाला लावतो. संकटांची, अडथळ्यांची शर्यत पार करतो. माणूस आणि यंत्र याचं साहचर्य आणि संघर्ष हा विषय काहीसा शुष्क; पण जिद्दीने बी. आर. चोप्रा त्यावर चित्रपट करतात ‘नया दौर’ आणि पंजाबच्या रंगीत आणि जोशपूर्ण संगीताची जादू घडते. ‘रेशमी सलवार कुर्ता जाली का...’वर पाय थिरकतात. सिनेमाची मोहमयी दुनिया नित्य नवी सजते ती अशी.
लोकप्रिय सिनेमा आणि लोकप्रिय संगीत हे आपल्या चित्रपट निर्मितीचे सूत्र आहे, असं सांगणाऱ्या राज कपूरने वर्ष ५६ मध्ये लेखक ख्वाजा अहमद अब्बास यांची कथा बंगालच्या रंगभूमीचे प्रयोगशील नाट्यकर्मी शंभू मित्रा यांच्याकडे सोपवली. कथेचा नायक एक खेडूत, शहरात कामाच्या शोधात आलेला साधा भोळा. रात्री शहरात उंच इमारतीच्या भूलभुलैयात केवळ पाणी प्यायला मिळेल, या आशेनं आलेला. आणि महानगराच्या त्या वस्तीतलं गुन्हेगारी विश्व त्याला दिसतं. एका रात्रीच्या अवधीत घडलेलं नाट्य आणि शहरातली उच्चभ्रूंची वस्ती इतकेच नेपथ्य. खरंतर नाट्यकृतीचा विषय.